शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By आर्ट ऑफ लिविंग|

महिलांवरील अत्याचार टाळण्यासाठी मानवी मूल्यांचे जतन

भानुमती नरसिंहन

WD
महिलांवरील घरगुती अत्याचारांना रोखण्याच्या दृष्टीने मार्ग शोधण्यासाठी नुकतेच वॉशिंग्टन डीसीमध्ये माझी काही महिला नेत्यांबरोबर भेट झाली. महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही.खरे म्हणजे हा महिलांच्या हक्काचा प्रश्न नसून मानवी हक्काचा प्रश्न आहे. जर महिलांना सुरक्षित वाटत नसेल तर संपूर्ण समाजाचीच उलथापालथ होते आणि त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनी उठून अन्याया विरुद्ध झगडून योग्य मार्ग शोधला पाहिजे. माझा ठाम विश्वास आहे की मानवी मूल्यांचे जतन करून महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे .

भारतीय परंपरेत महिला आणि पुरुष दोघांनाही जीवनाच्या सर्व स्तरांवर सारखाच मान दिला जातो. याचेच प्रतिक म्हणजे अर्धनारीनटेश्वराचे रूप, ज्यात देव अर्धा नराच्या रूपात आणि अर्धा नारीच्यारुपात दाखवलेला आहे. त्यातून हे सांगायचे असते की सृष्टीची निर्मिती तिचे पालन यात त्या दोघांचा समान सहभाग असतो. आपल्या शरीरातील पेशीही आई आणि वडील दोघांच्या गुणसूत्रांपासून बनलेल्या असतात. प्रत्येकामध्ये दोन्ही शक्ती समप्रमाणात असतात. यिन आणि यँग मध्ये हीच संकल्पना मांडलेली आहे. चांगल्या आणि प्रगतीशील समाजासाठी प्रत्येकामधील हे संतुलन असणे गरजेचे आहे. आपण महिलांचा आदर करायला हवा आणि त्यांच्या पदाचा मान राखायला हवा.

WD
मोठ्या शहरातून घडत असलेल्या घटना या अत्याचाराच्या विरोधात काही करण्याच्या दृष्टीने काळजी करण्यासारख्या आणि दक्षता बाळगण्यासारख्या आहेत. बळी पडलेल्यांना आणि कारणासाठी लढा देणाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे. यामधून त्यांचे सामर्थ्य दिसून येते. त्यांना लढा द्यायचा आहे आणि त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. न्याय मागण्यासाठी उठवलेल्या या आवाजांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पण यावर उपाय शोधण्यासाठी साकल्याने विचार व्हायला हवा.

आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की चिंता आणि आक्रमकतेने उपाय सापडणार नाही. आपल्याला शांत डोक्याने आणि सुस्पष्ट विचाराने कामा करून हे ठरवायला हवे की आपल्याला अशाच्या विरोधात लढायचे आहे आणि कसे ? जेव्हा आपण शांत डोक्याने आणि सुस्पष्ट विचार करून पावले उचलू तेव्हाच दीर्घकालीन उपाय सापडेल. आध्यात्मिक ज्ञान आणि साधना यामुळे आपल्याला मन शांत ठेवायला मदत होईल. समाजात मानवी मूल्ये टिकवण्यासाठी जीवन व्यतीत केलेल्या महान गुरुवर्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. सर्वांमध्ये कारुण्याची भावना जागवली पाहिजे. यासाठी ध्यान, प्राणायाम आणि इतर आध्यात्मिक साधना करण्याने फायदा होतो. त्यामुळे आपल्यात साठलेला ताण निघून जातो आणि मन ताजेतवाने होते आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.

WD
महिलांवरच्या अत्याचाराच्या रोगाचा परिणाम जगभरातील समाजावर होतो. अशा घटनांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची महत्वाची भूमिका प्रसारमाध्यामांची असते त्यांच्यामुळे मार्ग निघण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु होऊ शकते. बरेचदा अशा नकारात्मक घटनांवर लक्ष केंद्रित केल्याने भीती आणि चिंता यांचे एक दुष्टचक्र सुरु होते. मानवी मूल्ये आणि आपल्या जीवनातील अध्यात्माचे स्थान याकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवे. आपण एक मैत्रीपूर्ण आणि करुणामय असे वातावरण तयार करू शकू. आपल्या भोवतालच्या लोकांशी आपला काही संबंध आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपण अन्याय होऊ न देण्यासाठी काही तरी करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारांना कडक शासन करणारे कायदेही असायला हवेत.

दारुमुळे समाजात जे अराजक माजले आहे त्याबद्दलही आपल्याला विचार करायला हवा. मद्यपान हे बरेचदा एक फॅशन म्हणून केले जाते. पण वास्तव हे आहे की दारू प्यायल्यानंतर एखादा सुशिक्षित माणूसही दारूच्या प्रभावाखाली जातो. दारूची नशा हे महिलावरील अत्याचाराचे मूळ कारण आहे, अगदी प्रगत सामाजातदेखील.

सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की समाजातील विकृत घटना घडण्याचे मूळ कारण मानवी मूल्ये नष्ट होणे हा आहे. एकमेकाची काळजी घेणे, एकमेकात वाटून घेण्याची वृत्ती ठेवणे, आपलेपणा बाळगणे, सेवा करण्यासाठी बांधील असणे या सारखी निरोगी, आनंदी आणि सुसंवादी समाजाचे मूळ असलेली अध्यात्मिक मूल्ये पुन्हा एकदा रुजवण्याची जबाबदारी प्रत्येकाने पुढे येऊन घेण्याची गरज आहे.

भानुमती नरसिंहन या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला सबलीकरण आणि बाल कल्याण विभागाच्या संचालिका ; तसेच ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ या दरम्यान होण्याऱ्या, आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या अध्यक्षा आहेत. अधिक माहितीसाठी बघा iwc.artofliving.org