शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (09:26 IST)

बर्फाचे तट पेटूनि उठले सदन शिवाचे कोसळले... १९६२ च्या भारत चीन युद्ध पृष्ठभूमीवर लिहिलेली ही कविता आहे.

बर्फाचे तट पेटूनि उठले 
सदन शिवाचे कोसळले
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
असुरांचे पद भ्रष्ट लागुनि 
आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा 
तटस्थतेने दूर पळे?
कृतांत ज्वाला त्वेषाची 
ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सारे, राणीची 
नौबत आता धडधडते !
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
सह्यगिरीतील वनराजांनो, 
या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतन्त्रतेला 
रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव 
करा हिमाचल लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो, 
समरदेवता बोलविते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
खडक काजळी घोटुनि तुमचे 
मनगट-बाहू घडलेले
कडेकपरिमधील वणवे 
उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर 
डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ 
पाठीशी अपुल्या पाजळते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
कोटी कोटी असतील शरीरे- 
मनगट अमुचे एक असे
कोटी कोटी देहात आजला 
एक मनीषा जगतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे 
अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो 
राहील रण हे धगधगते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
- कुसुमाग्रज