शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 12 जुलै 2021 (21:42 IST)

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
 
महाविकास आघाडीला सुरुंग लावला जातोय, असं अजित पवार म्हणाले. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला कमकुवत करण्याची, अडचणीत आणणारी आहे, असं अजित पवारांचं म्हणणं आहे. पटोलेंच्या या भूमिकेबाबत आघाडीचे नेते काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
 
नवाब मलिकांचा हल्लाबोल
नाना पटोलेंच्या या आरोपांना नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. मलिक म्हणाले, नाना पटोले यांनी जे‌ आरोप केलेत‌ ते त्यांनी माहितीच्या अभावानं हे आरोप केले आहेत‌. कुठलंही सरकार असेल तरी अशा पद्धतीनं माहिती गृहखातं संकलित करत असतं. सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असते. हे आताच होतंय असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होतं. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांनी माहिती न घेतल्याने असे आरोप करत आहेत, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.