1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (08:34 IST)

राज्यातील एकही सरकारी मालमत्ता विकू देणार नाही : नाना पटोले

काँग्रेस सरकारने उभे केलेले एअर इंडिया, भेल, विमा कंपन्या, रेल्वे हे सर्व मोदींनी आता विकायला काढले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोकण रेल्वेही विकायला काढली आहे. देश विकण्यासाठी मोदींना जनतेने सत्ता दिलेली नव्हती. आता मोदी सरकारला यापुढे महाराष्ट्रातील एकही सरकारी मालमत्ता विकू देणार नाही’, असा इशारा नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. 
 
‘मागील सहा वर्षात मोदी सरकारने मनमानीपद्धतीने कारभार चालवलेला आहे. शेतकरी अडचणीत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात आहे. पण, नरेंद्र मोदी यांना त्याचे दुःख नाही. म्हणून या अन्यायी, अत्याचारी मोदी, भाजपा, आरएसएस सरकारला हुसकावून लावण्याचे काम करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. त्याचा समाचार घेत सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे मोदी हे ढोंगीजीवी आहेत’, असा टोला लगावला आहे.
 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पार पडला त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नवनियुक्त कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला.