1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2023 (11:50 IST)

राहुल गांधींचं लग्न हा राजकीय विषय आहे की खासगी?

rahul gandhi
लोकसभा निवडणुका आता जवळ येत आहेत. काँग्रेस संपूर्ण ताकदीसह विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या विचारात आहेत. त्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष सक्रिय भूमिकेत आहेत.त्यातच राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा जोरात आहे, त्याचे राजकीय फायदे शोधण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचं दिसत आहे.
जून महिन्यात विरोधी पक्षांच्या बैठकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला दिला होता आणि पुढचे काही दिवस त्याचा कसा फायदा होईल याची चाचपणी ते करत राहिले.
 
आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आहे.
 
त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी यांनी एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यात हरियाणामधून आलेल्या काही महिला शेतकऱ्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.
 
त्यातली एक महिला सोनिया गांधींना राहुल गांधींचं लग्न करून देण्याचा सल्ला देते.
 
त्याच्या उत्तरादाखल सोनिया गांधी म्हणतात, “तुम्ही मुलगी शोधा ना.”
 
व्हीडिओमध्ये राहुल गांधी या मुद्द्यावर बोलताना दिसतात. ते म्हणतात, “होऊन जाईल.”
 
राहुल गांधींनी एका दौऱ्यादरम्यान या महिलांची भेट घेतली होती आणि त्यांनी घरी आमंत्रित केलं होतं. त्यानुसार सोनिपत येथील महिलांना सोनिया गांधीच्या घरी बोलावलं होतं. या महिलांसाठी जेवणाची सोय सोनिया गांधींनी केली होती.
या महिलांबरोबर राहुल गांधीनी एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यावेळी ही लग्नाची चर्चा झाली होती.
 
प्रियंका गांधी यांनीही त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी या महिलांबरोबर शेअर केल्या.
 
आठ जुलैला हिमाचल प्रदेशला जाताना काही वेळ राहुल गांधी सोनिपतला थांबले होते. तेव्हा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळ दिला आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. तिथे त्यांनी भातलावणी केली, महिलांबरोबर भोजन केलं.
 
त्यानंतर या महिलांनी राहुल गांधींकडे दिल्ली दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती.
 
या आधीही झाली होती चर्चा
जून महिन्यात दिल्लीतील करोलबाग भागात त्यांनी मोटरसायकल दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकबरोबरही चर्चा केली होती. तेव्हाही विकी नावाच्या मेकॅनिकने त्यांना विचारलं, “तुम्ही लग्न कधी करत आहात?”
 
त्यावर राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मीसुद्धा करेन.”
विक्की म्हणाले, “मी त्यांना विचारलं की तुम्ही लग्न वगैरे करणार नाही का तर त्यावर ते म्हणाले की करेन कधीतरी.”
 
लालू यादव यांचं विधान आणि विविध तर्क
राहुल गांधीचं लग्न झालेलं नाही मात्र आतापर्यंत कधीच त्यांच्या लग्नाची इतकी चर्चा झाली नाही.
 
गेल्या काही महिन्यात राहुल गांधी मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून समोर आले आहेत. 2013 मध्ये अशीच चर्चा झाली होती. पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती.
 
तेव्हा अभिनेत्री मल्लिका शेरावतने मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून नरेंद्र मोदींचं नाव घेतलं होतं.
 
गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणाने राहुल गांधींच्य लग्नाची चर्चा होतेय आणि राहुल गांधीसुद्धा त्याला उत्तर देत आहेत.
 
गेल्या महिन्यात पाटण्यात विरोधी पक्षांची एक बैठक झाली. त्यात 15 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एकाच मंचावर दिसले.
 
तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “आमचं ऐका आणि लग्न करून टाका. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही लग्न केलं तर आम्ही वऱ्हाडी म्हणून येऊ.”
 
त्यावर राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही म्हणताय तर होऊन जाईल.”
 
या हलक्या फुलक्या संवादाचे अनेक अर्थ काढले गेले. अनेक विश्लेषकांनी दावा केला की राहुल गांधींना नवरदेव करून त्यांना विरोधी पक्षाचा चेहरा आणि वऱ्हाडी म्हणून इतर पक्षांना समोर आणण्याचा तो प्रयत्न होता.
 
राजकारणात किती फायदा होणार?
राहुल गांधींच्या लग्नाच्या चर्चेतून राजकीय फायदा काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत
 
अनेकदा त्याला महिलांशी जोडून पाहिलं जातं. 1962 नंतर निवडणूक आयोगाने लिंगाआधारित मतदानाची आकडेवारी द्यायला सुरुवात केली होती. त्यानुसार महिला कायम काँग्रेसबरोबर आहेत
 
मात्र 2019 मध्ये हे चित्र बदललं आणि भाजपला महिलांनी सर्वांत जास्त पसंती दिली. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाला तेव्हा CSDS चे संजय कुमार यांनी सांगितलं होतं की महिलांना आता भाजपा आवडायला लागली आहे. त्यामागे नरेंद्र मोदी निश्चितच जबाबदार आहे.
 
राहुल गांधीही महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना सर्व वयोगटातल्या महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र राजकीय विश्लेषक याला फारसं महत्त्व देताना दिसत नाहीत.
 
राजकीय विश्लेषक आणि लेखक रशीद किडवई म्हणतात, “2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना फायदा होईल असं सगळं केलं जात आहे.”
 
मात्र किडवई यांच्या मते खासगी गोष्टींचा सार्वजनिक आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही.
 
ते सांगतात, “मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या लग्नाचा त्यांच्या राजकीय आयुष्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याचप्रमाणे धर्मेंद्र जेव्हा निवडणूक लढवायला निघाले तेव्हा त्यांच्या दुसऱ्या लग्नाची बरीच चर्चा झाली मात्र निवडणुकांच्या निकालावर त्याचा फारसा फरक पडला नाही.”
 
किडवई म्हणतात की राजकीय नेत्यांनी लग्न केलं की नाही, तो एकटे आहेत की नाही याने काहीही फरक पडत नाही.
 
भारतात विवाहित नेते अनेक आहेत मात्र अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींसारखे नेते आहेत ज्यांनी लग्न केलं नाही किंवा त्यांच्या पत्नीबरोबर दिसले नाहीत. मात्र जनतेने तरीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला.
 
ते म्हणतात, “जनता मुद्द्यांवर त्यांचा नेता निवडते. उदा. अभिनंदन यांना पाकिस्तानातून भारतात आणण्यात भाजप यशस्वी ठरलं. या निर्णयाचा महिलांवर मोठा प्रभाव पडला. राहुल गांधी जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महिलांमध्ये त्यांची प्रतिमा उजळतेय असं काही नाही.”
 
लग्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
लग्नाच्या विषयावर राहुल गांधींनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान चर्चा केली होती.
 
त्यादरम्यान एका मुलाखतीत ते म्हणाले होते की ते एका अशा महिलेबरोबर लग्न करू इच्छितात ज्यांच्यात सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीसारखे गुण असतील.
 
आणखी एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “माझ्या आईवडिलांचे संबंध चांगले होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यामुळे माझ्या अपेक्षा जास्त आहेत. जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा मी लग्न करेन. ती मिळाली तर छान होईल.”
 
नंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की त्यांच्या मनात लग्न आणि मुलाबाळांचा विचार येतो मात्र ते असं करू शकत नाहीत.
 

Published By- Priya Dixit