1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (15:14 IST)

राहुल गांधींनी 'फ्लाइंग किस' दिला, स्मृती इराणींचा आरोप; भाजप खासदारांनी म्हटलं

smriti Irani
आज (09 ऑगस्ट) ला संसदेत अविश्वास ठरावावर पुन्हा चर्चा सुरू झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना 'आज मै दिमाग से नही, दिल से बोलूंगा' असं म्हटलं.
 
खासदारकी बहाल झाल्यानंतरचं त्यांचं हे पहिलंच भाषण होतं. लोकसभेत पुन्हा घेतले म्ह्णून लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले.
 
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांनी म्हटलं, "जो पर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपण लोकांचा आवाज आपण ऐकू शकत नाही. भारत एक आवाज आहे आणि या देशाचा आवाज ऐकावाच लागेल."
 
"मी मणिपूरमध्ये गेलो, पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी देशाचा भाग नाही. आज मणिपूर दोन भागात विभाजित झालाय."
 
"मणिपूरच्या कॅम्प मध्ये महिला नाही मुलांशी चर्चा केली . एका महिलेनं मला सांगितलं एकच मुलगा होता. माझ्या मुलाला माझ्या डोळ्यासमोर गोळी मारली, ती रात्रभर मुलाच्या मृतदेहापाशी बसली. त्याची आठवण म्हणून त्याचा एक फोटो आहे असं त्यांनी सांगितलं."
 
मी दुसऱ्या मणिपुरी महिलेला विचारला तुमच्यासोबत काय घडलं. त्या आठवणींनी ती महिला घाबरून बेशुद्ध पडली."
 
ही फक्त मणिपूरची नाही, तर भारत मातेची हत्या आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलं.
 
राहुल गांधी संसदेत बोलताना संसद सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले, "भारत मातेची हत्या या शब्दप्रयोगावरून राहुल गांधींनी माफी मागायला हवी."
 
'भारत जोडो' यात्रा संपलेली नाही - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मी 'भारत जोडो' यात्रेदरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत प्रवास केला.
 
यावेळी दररोज 25 किलोमीटर चालणं आपल्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, असं वाटायचं. कारण मी रोज 10 किलोमीटर चालतो आणि हा त्यांचा अहंकार होता.
 
"भारताने प्रत्येक अहंकार मिटवलाय. यात्रेदरम्यान दर दोन-तीन दिवसांनी माझा गुडघा दुखायचा. जेव्हा ही भीती (गुडघ्यांबद्दल) वाढायची तेव्हा माझ्यात कुठून ना कुठून शक्ती यायची. एके दिवशी एक लहान मुलगी आली आणि मला एक पत्र दिलं आणि ती म्हणू लागली की मी तुमच्या बरोबर चालते आहे, त्यामुळे मला बळ मिळालंय."
 
एका शेतकऱ्याचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, त्याचं दुखणं हे माझं दुखणं आहे.
 
"लोक म्हणतात की हा एक देश आहे, काहीजण म्हणतात की वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या बोली आहेत. हा देश फक्त एक आवाज आहे. हे वास्तव आहे. हा आवाज ऐकायचा असेल तर आपल्या हृदयातील अहंकार आणि स्वप्नांवर मात करावी लागेल."
 
स्मृती इराणी यांनी केले आरोप
स्मृती इराणी म्हणाल्या की, या सभागृहात भारत मातेच्या हत्येबद्दल बोलताना विरोधी आघाडीच्या 'इंडिया'च्या नेत्यांनी बाकं वाजवून समर्थन दिलं.
 
"मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो नेहमीच भारताचा भाग होता, आहे आणि राहील. आज देशाने पाहिलंय की, भारतमातेच्या हत्येची चर्चा सुरू असताना काँग्रेसने टाळ्या वाजवल्या."
 
भारत मातेच्या हत्येबद्दल बोलणारे बाकांवर बसून बाकं बडवत होते. भारताच्या इतिहासात आजपर्यंत असं घडलं नाही.
 
लोकसभेत स्मृती इराणी यांनी काश्मिरी पंडितांचाही मुद्दा उपस्थित केला.
 
स्मृती इराणी यांनी राजस्थानमधील भिलवाडा येथे 14 वर्षीय मुलीची हत्या आणि कथित सामूहिक बलात्काराचा मुद्दाही उपस्थित केला.
 
काँग्रेस खासदारांवर निशाणा साधत स्मृती म्हणाल्या की, तेव्हा त्यांच्या हृदयात धडकी भरली नाही का?
 
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सभागृहात राहुल गांधींवर आरोप करताना म्हणाल्या की, सभागृहाबाहेर जाताना राहुल गांधी यांनी चुकीचे हावभाव केले.
 
राहुल गांधी यांनी सभागृहात जे केलं ते अपमानास्पद असल्याचं इराणी म्हणाल्या.
 
भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या, "एक सदस्य संसदेच्या आत फ्लाइंग किस देतोय. हे कसलं कृत्य आहे? यासंदर्भात सभापतींकडे तक्रार केली असून सीसीटीव्ही फुटेज घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे."
 
केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या की, "राहुल गांधींनी भाषण संपवलं आणि स्मृती इराणींनी भाषण सुरू केलं तेव्हा राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिलं. कधी ते संसदेत डोळा मारतात तर कधी फ्लाइंग किस देतात. आमचा या कृतीला विरोध आहे. आम्ही महिला खासदारांनी सभापतींना यासंदर्भात पत्र दिलं आहे."
 
भाजप खासदार रवीशंकर प्रसाद यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, फ्लाइंग किस केलं...राहुल गांधींना नेमकं काय झालंय. त्यांना काही भान नाही. त्यांचं भाषणही काय होतं. भारत मातेची हत्या केली असं म्हटलं. राहुल गांधी, भारत माता अमर आहे.
 
त्याचवेळी, राहुल गांधींचं भाषण सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी ट्विट करत म्हटलंय, "संसदेतील देशवासीयांचा आवाज."