उत्तर भारतात थंडीचा कडाका
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून दिल्लीतही पारा नेहमीच्या तुलनेत खूप खाली घसरला आहे. दिल्लीचे कमाल तापमान रविवारी 15 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले आहे. हे तापमान नेहमीच्या तुलनेत 7 अंशांनी घटले आहे. दिल्लीचे किमान तापमान 6.4 अंशापर्यंत खाली आले आहे.
श्रीनगर शहराच्या तापमानात रविवारी 2 अंशाची वाढ झाली आहे. परवा श्रीनगरचे तापमान वजा 4.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले होते. काल तापमानात वाढ झाल्याने पारा 1.8 अंशावर आला आहे. हिमाचल प्रदेशातही थंडीचा कडाका कायम आहे. केलांग, मनाली आणि कल्पा येथील तापमान अनुक्रमे वजा 7, वजा 3 आणि वजा 1.6 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले आहे.
राजस्थानात थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चुरू येथे 0.5 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदले आहे. रेल्वे गाडय़ा आणि रस्ते वाहतुकीवरही थंडीचा विपरीत परिणाम झाला आहे.
सोलापूरही गारठले
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून किमान तापमान 11.9 अंशापर्यंत खाली आले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांची उबदार व लोकरीचे कपडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत.