शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (12:05 IST)

बिलावल भुट्टोला भारताने खडसावले

बिलावल भुट्टो याचे ‘पूर्ण काश्मीर मिळवेन’ हे वक्तव्य वास्तवापासून दूर आहे, असे सांगून देशाच्या एकात्मकतेबाबत तडजोड होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरूद्दीन यांनी या शब्दात बिलावल याला खडसावले आहे.
 
‘आम्हाला पुढे जायचे आहे. मात्र पुढे जाणे म्हणजे सीमेत बदल करणे नव्हे, आम्ही हे स्पष्ट केले आहे की भारताच्या एकात्मकतेसंबंधात तडजोड होऊ शकत नाही,’ असेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी ठणकावून सांगितले आहे.
 
काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि राहील. याबद्दलची कोणतीही चर्चा आम्ही मान्य करणार नाही. काश्मीर भारतीयांच्या मनात आहे, असे भाजपचे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी स्पष्ट केले.
 
बिलावलची दर्पोक्ती  
 
भारताकडून संपूर्ण काश्मीर ताब्यात घेऊ अशी दर्पोक्ती पाकिस्तान पीपल्स पार्टीचा नेता बिलावल भुट्टो याने केली आहे. काश्मीर हा पाकिस्तानचाच भाग असून त्याची एक इंच भूमीही मी भारताकडे ठेवणार नाही असे वक्तव्य बिलावलने पंजाब प्रांतातील मुल्तानमधील सभेमध्ये केले.
 
26 वर्षाचा बिलावल हा मुल्तानमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होता. त्यावेळी बोलताना तो म्हणाला, ‘भारताकडून काश्मीर ताब्यात घेण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. एक इंच भूमीही मागे ठेवणार नाही. काश्मीर हा पाकिस्तानचाच भाग आहे.’ यावेळी माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी आणि राजा परवेज अश्रफ बिलावलच्या बाजूलाच उपस्थित होते.
 
बिलावल याने पाकिस्तानात 2018 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पक्ष अधिकृतरीत्या भारताच्या जवळचा पक्ष मानला जातो.
 
बिलावलचे आजोबा आणि बेनझीर यांचे वडील झुल्फीकार अली भुट्टो यांनी 1967मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीची स्थापना केली. त्यानंतर ते 1970मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. बिलावल याची आई बेनझीर भुट्टो यांनी दोनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवले होते. तर बिलावलचे वडील अश्रफ अली झरदारी हे 2008 ते 2013 दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान होते.