शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 डिसेंबर 2014 (10:50 IST)

हाफिज सईदला ‘साहिब’ म्हटलने भारत युनोवर भडकला

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात -उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचा संयुक्त राष्ट्रसंघाने ‘साहिब’ असा उल्लेख केल्याने भारताने त्यावर तीव्र शब्दात आपला आक्षेप नोंदवला आहे. भारताने यूनोला एक पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
 
भारताने 17 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाकडे हाफिज सईदची तक्रार केली होती. अफगाणिस्तानमधील हेरात येथे असलेल्या भारतीय दुतावासावर झालेल्या हल्ल्यामागे लश्कर-ए-तैयबा आणि हाफिज सईदचा हात असल्याचा आरोप भारताने या तक्रारीत केला होता. या तक्रारीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषद समितीचे अध्यक्ष गॅरी क्वीनलन यांनी जे स्पष्टीकरण भारताला पाठविले आहे त्यात हाफिज सईदचा उल्लेख ‘साहिब’ असा करण्यात आला आहे. एका दहशतवाद्याचा सन्मानाने झालेला हा उल्लेख भारताला झोंबला असून भारताने तीव्र शब्दांत त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
हाफिज सईद हा भारताचा नंबर एकचा शत्रू आहे. भारताविरोधात सतत गरळ ओकणार्‍या हाफिजने नुकत्याच पेशावरमधील सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्यासही भारतालाच जबाबदार धरले आहे. गंभीर बाब म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थायी सदस्य असलेल्या अमेरिकेनेही हाफिजवर 50 कोटी रुपयांचे (एक कोटी डॉलर) इनाम जाहीर केले आहे.