शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (08:05 IST)

मग ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?

अयोध्येतील बहुप्रतिक्षित असलेल्या राम मंदिराच्या निर्माणाचा मुहुर्त ठरला असून ५ ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असल्याची चर्चा आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला. पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक झाली असून प्रतिसवाल केला आहे. “…जर मंदिर बांधून कोरोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?,” असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांना केला आहे.
 
शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. “आम्हाला वाटतं की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल,” असा टोला अप्रत्यक्षपणे पवारांनी मोदींना लगावला. यावर प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं ते. देशातील कोरोनोचा प्रादुर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना पंतप्रधान मोदी हे करत आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे. परंतु आपल्या देवदेवतांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जर मंदिर बांधून आणि देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील कोरोना जाऊ दे असं साकडं का घातलं? त्याचं उत्तर आपल्याकडे आहे काय?,” असा सवाल दरेकर यांनी पवारांना विचारला आहे.