1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (08:11 IST)

'म्हणून' चंद्रकांत पाटील रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सामना अग्रलेखात वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी चंद्रकांत पाटील त्यांच्याकडे विचारणा करणार आहेत. 
 
पुढे ते म्हणाले की, “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.
 
“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.