मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: लातूर , बुधवार, 16 ऑगस्ट 2017 (09:23 IST)

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर

मराठवाड्यात पावसाने पेरणापुर्वी वेळेत दमदार हजेरी लावल्याने आनंदी झालेल्या बळीराजाने बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही खरिपाचा अक्षरशः जुगार खेळला. त्याने उसणवारी करत पेरणी केली. मात्र पावसाने दिड-दोन महिन्यापासून दांडी मारल्याने पिके जळू लागली आहेत. खरीपाचा हा जुगार हरलेल्या शेतकऱ्यांना पाणावलेल्या डोळ्यांनी पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, विधानसभा-लोकसभेत वेगवेगळ्या विषयावर रणकंदन माजवले जात असताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांविषयी कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही.
 
गेली 4 वर्ष दुष्काळ सहन करत घर सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना नापिकीने, कधी अवकाळीने, कधी गारपिटीने तर कधी अतिवृष्टीने मारले आहे. डोक्‍यावर असलेले कर्ज आणि खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी धीर धरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता नविन संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याच्या खोटारडे अंदाजावर विश्‍वास ठेवत शेतकऱ्यांनी दिरवेगार स्वप्न पाहिले. मात्र, मागील दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने हि हिरवी स्वप्ने आता करपू लागली आहेत. खरीपाची पिके पाण्याअभावी वाळत असताना नांगर फिरवण्याशिवाय मार्ग दुसरा नसल्याचे शेतकरी वर्गात बालले जात आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही वेगवेगळ्या विषयांवर विधानसभेत आणि लोकसभेत रणकंदन माजले असताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानीसोबतच सुलतानी मार सहन करण्याची वेळ आली आहे.