शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई: अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका Photo

मुसळधार संततधारेच्या रूपात मंगळवारी कोसळलेल्या वरुणराजाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही या वेळी ठप्प पडली आणि पाण्यात गेलेल्या मुंबईने पुन्हा एकदा मुंबईकरांना ‘२६ जुलै‘ची धडकीच भरली.

मुंबई-नागपूर दुरोंतो एक्स्प्रेसचे डबे सकाळीच घसरल्याने बाहेरगावी जाणाºया गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यात मुंबईत सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने दुपारनंतर कहर सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच चहूबाजूंनी मुंबईला पावसाचा वेढा बसला. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा थांबला. परिणामी, शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचू लागले. अखेर काही तासांतच मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प झाली. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
 
येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.