शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

हिजड्यांला मुले होतील मात्र सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही - गडकरी यांचे वादग्रस्त विधान

निवडणुकीनंतर नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याची सध्या राज्यात जोरदार  चर्चा आहे. तर दुसरीकडे गडकरींची काही वादग्रस्त विधानं चर्चेत आहेत. गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन सारवासारव केली होती. ते संपत नाही तोच आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असं गडकरी सांगलीतील एका कार्यक्रमात म्हणाले आहेत.  
 
गडकरी हे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.  सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ घसरली आहे. गडकरी हे टेंभू सिंचन योजनेविषयी बोलत होते.  गडकरींनी वादग्रस्त विधान केलं. 'टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपासरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,' असं गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.