शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्राचे मंत्रालय जणू उंदरालय झालंय

सध्या भाजपा सरकारला उंदीर प्रश्न जरा जास्तच महाग पडत आहे. सर्व स्तरातून यावर टीका होत आहे. खुद भाजपा जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उंदीर घोटाळा बाहेर आणला आहे. यामुळे सरकारवर चोहीकडून टीका होत आहे. यातच मित्र पक्ष शिवसेना कसा मागे राहील. शिवसेनेन नेहमी प्रमाणे सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे मंत्रालय नाही तर उंदरालय आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानाच्या अग्रलेखातून सरकारला धारेवर धरले आहे. सरकार काय ? करतय. या भ्रष्टाचारामुळे सरकारची तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोल फोडले आहेत असंही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
 
सामनाचा अग्रलेख पुढील प्रमाणे आहे. : 
उंदीर घोटाळय़ाने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’झाली आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळ्याचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’लावून बसलीच आहे!
 
उंदीर हा ‘शेतकऱ्याचा मित्र’म्हटला जातो हे आतापर्यंत माहीत होते, पण तो ‘घोटाळेबाजांचाही मित्र’असल्याचे महाराष्ट्राच्या विधिमंडळातच उघड झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीच गुरुवारी मंत्रालयात ‘उंदीर घोटाळा’झाल्याचा ‘स्फोट’केला. त्यामुळे देशभरातील घोटाळय़ांमध्ये आणखी एका घोटाळय़ाची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली आहे. विधिमंडळातील या गौप्यस्फोटामुळे घोटाळेबाज असा शिक्का बसलेल्या मंत्रालयातील उंदीरमामांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या हे कळायला मार्ग नाही. कदाचित, हे आरोप हेतुपुरस्सर आणि मूषकयोनीला बदनाम करण्याचे कारस्थान आहे असे म्हणत राज्यभरातील मूषकराजांचा एखादा लाँगमार्च उद्या मुंबईवर धडकू शकतो. या लाँगमार्चचे निवेदन मुख्यमंत्री स्वीकारतात की नाही हे सांगता येणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या मोहिमेतच हा घोटाळा झाल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यावर खुलासे-प्रतिखुलासे होत राहतील, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे ‘कार्य’करू शकतात हा नवा साक्षात्कार महाराष्ट्राला झाला हेदेखील महत्त्वाचेच. केंद्र वा राज्यांच्या तिजोऱ्या फक्त लुटल्याच जातात असा कालपर्यंत एक सार्वत्रिक समज होता. महाराष्ट्राच्या मंत्रालयातील उंदरांनी तो समज खोटा ठरवत सरकारची तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते, हा नवा संदेश समस्त घोटाळेबाजांना दिला आहे. 
 
‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’असे म्हणण्याऐवजी भविष्यात ‘तुझ्या उसाला लागंल उंदीर’असे म्हटले जाईल.‘कागदी घोडे’असा शब्द सरकारी कामकाजासंदर्भात वापरला जातो. त्याची जागा ‘कागदी उंदीर’हा शब्द घेईल. ख्यातनाम कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘पिपात मेले ओले उंदीर’या प्रसिद्ध कवितेचेही ‘मंत्रालयात मेले घोटाळेबाज उंदीर’असे विडंबन केले जात आहे. मर्ढेकरांनी या कवितेत ‘माना पडल्या आसक्तीविण’असे म्हटले असले तरी मंत्रालयातील उंदीरमामांनी जी‘आसक्ती’दाखवली आहे त्यामुळे घोटाळेबाजांची मान निश्चित ताठ झाली असेल. अर्थात सरकार आणि सत्ताधाऱ्यांची मान खाली झुकली आहे ही गोष्ट वेगळी. कारण उंदीर घोटाळय़ाने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत.