शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जुलै 2020 (15:37 IST)

महाराजांचा अपमान होण्यासारखे काहीही घडलेले नाही

राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सदस्यत्वाचे शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली. यावेळी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत हे राज्यघटनेला धरून नाही, तुम्ही फक्त शपथ घ्या, अशी भूमिका मांडली. त्यावरून हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे अशी आरोळी देत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यासंदर्भात उदयनराजे भोसले पत्रकार परिषद घेऊन ‘राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होण्यासारखे काहीही घडलेले नाही. उगाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण करू नये, असे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार बोलताना म्हणाले की, ‘‘जय भवानी, जय शिवाजी’ नियमबाद्य किंवा घटनाबाद्य आहे असे मला कधीच वाटले नाही. मी उदयनराजे भोसले यांच्या भावनांशी सहमत आहे.’
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘भाजप खासदार उदयनराजे भोसले याचा संवाद ऐकणे आनंदाचे असते. ते अत्यंत मोकळेपणाने बोलत असतात. मी त्यांची पत्रकार परिषद ऐकली असून मी त्यांच्या भावनांशी सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कोणीही राजकारण करू नये, त्यांचा अपमान कोणी सहन करू नये. तसेच जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला तर महाराष्ट्र शांत बसणार नाही. ही वस्तूस्थिती आहे आणि तेच मत उदयनराजे भोसले यांनी मांडले. त्यांनी काही चुकीचे सांगितले आहे असे मला वाटत नाही आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा आहे. मला ही घोषणा कधी नियमबाद्य किंवा घटनाबाद्य आहे असे मला कधीच वाटले नाही.