मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:10 IST)

कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या गाडीसमोर ओतली सोयाबीनची पोती

किचकट शासकीय प्रक्रियेमुळे सोयाबीन हमी केंद्रावर पडून, योग्य दर मिळण्याची केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची पोती ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे पालकमंत्री विजय शिवतारे आणि मंत्री महादेव जानकर यांच्या गाड्या अडवल्या. सोयाबीनला योग्य दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारकडून या प्रकरणी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी  केला.

सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्यातून जगलेले काही पीक हे आता सरकारी कचाट्यात अडकले आहे. सातबारा उताऱ्यावर सोयाबीनची नोंद असेल तरच खरेदी केंद्रावर नोंदणी होऊ शकेल असा फतवा काढण्यात आला असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

सोयाबीनसाठी क्विंटलला ३ हजार ५० रुपये दर आधारभूत निश्चित करण्यात आला आहे. या दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्याला बाजार समितीच्या हमी भाव खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागत आहे. काही शेतकरी ऊसात सोयाबीन हे आंतरपीक घेतात. मात्र, आंतरपिकाची नोंद केली जात नाही. सातबारा उताऱ्यावर केवळ ऊसच दिसत असून सोयाबीन नाही. रानात सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात मोठया प्रमाणात होते. मात्र, सातबारा उताऱ्यावर खरीप आणि रब्बी असा स्वतंत्र कॉलमच नाही. ऑनलाईन खरेदी केंद्रावर नोंदणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.