शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (21:20 IST)

एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या की हत्याकांड? पोलिस तपासात धक्कादायक बाब उघड

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळा येथे एकाच कुटुंबातील ९ जणांच्या कथित सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणाला धक्कादायक वळण आले आहे. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २५ जणांना अटक केली होती. मात्र तांत्रिकासह अन्य एका व्यक्तीच्या अटकेनंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तांत्रिकाने कुटुंबातील सर्व सदस्यांना विष पाजून त्यांची हत्या केली. आणि या प्रकरणाला सामूहिक आत्महत्येचा रंग दिल्याचा दावा केला जात आहे.
 
तांत्रिक असलेला अब्बास मोहम्मद अली आणि धीरज चंद्रकांत सुरवसे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात नवीन तथ्ये समोर आली आहेत. त्यामुळे तपासाची दिशा बदलली असून त्याचे रूपांतर सामूहिक हत्येमध्ये झाले आहे. या दोघांनी संपूर्ण कुटुंबाला विष प्राशन करून त्यांची हत्या केली. मात्र, ही सामुहिक आत्महत्या असल्याचा रंग या प्रकरणाला दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हे दोघेही १८ जून रोजी गुपचूप सोलापूरहून म्हैसाळा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर या दोघांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला होता.
 
जनावरांचे डॉक्टर माणिक वनमोरे, त्यांचा भाऊ पोपट वनमोरे, ७२ वर्षीय आई, पत्नी आणि मुलांसह एकूण ९ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची बाब गेल्या आठवड्यात उजेडात आली होती. कथित सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. कुटुंबाने काही लोकांकडून कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यास सक्षम नसल्याचा दावा करण्यात आला होता. कर्ज न फेडल्यामुळे कुटुंबाचा सतत अपमान होत होता आणि या कारणावरून सर्वांनी मिळून आत्महत्येचा निर्णय घेतला असे सांगितले जात होते.
 
घटनेनंतर वनमोरे यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, कुटुंब आत्महत्या करेल असे वाटले नव्हते. एका शेजाऱ्याने तर संध्याकाळीच पाणीपुरीची मेजवानी दिल्याचे सांगितले होते. बँकेत नोकरी करणारी त्यांची एक मुलगीही घरी आली. अशा परिस्थितीत हे प्रकरण हत्येशिवाय दुसरे असू शकते, असा संशय पोलिसांना आधीच होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला. आणि आता हा प्रकार हत्याकांडाचा असल्याचे दिसून येत आहे.