शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (16:22 IST)

या सरकारकडे मदत करण्याची दानत नाही - सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यवतमाळ ते नागपूर असा पायी प्रवास केला. यावेळी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होता. पिकांचे नुकसान झाले, म्हणून बळीराजाला अश्रू अनावर होत होते. शेतकरी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर चालवत होते. मात्र, सरकारला कीव आली नाही. सरकारने अजूनही त्या शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कारण या सरकारकडे मदत करण्याची दानतच नाही, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी सरकारवर टीका केली. हल्लाबोलच्या दसरा चौक येथील सभेत ते बोलत होते.

 
शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली, पण त्यांना अर्धवट कर्जमाफी मिळाली. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
 
आज राज्यात रोजगार उपलब्ध नाही. आर आर आबा असताना मोठ्या प्रमाणात पोलीस भर्ती करण्यात आली होती. मेक इन महाराष्ट्राच्या नावावर कोल्हापूरला किती कोटीची गुंतवणूक मिळाली, असा सवाल उपस्थित होतो. उद्धव ठाकरे म्हणतात की सरकार नालायक आहे. उद्धवजी मग तुमचे मंत्री सरकारमध्ये काय करतात? असा सवाल करत भाजप आणि शिवसेना दोघेही राज्याच्या नुकसानीला जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
 
या सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकत्र यायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य घराघरात पोहोचवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
 
आम्ही सरकारमध्ये असताना कोल्हापूरला जे देता आले ते दिले. या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जे करता आले ते केले. मोदी लाट आली आणि मोदी पंतप्रधान झाले. पण यांनी तुमच्यासाठी काय केले? असा प्रश्न विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी केला.
 
संविधान बदलण्याची भाषा भाजपातील लोक करतात. ही कसली मस्ती आहे? संविधान आहे म्हणून आपला देश एकसंध आहे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी केली. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
 
एखादा मुद्दा अंगलट आला, तर तो मुद्दाच गायब केला जातो. हे काम करण्यात सरकार निष्णात आहे. देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल आपल्या राज्यात सर्वात जास्त महाग मिळते. याबाबत मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील यांनी उत्तर द्यावे. या सरकारच्या काळात ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रावर होणार आहे. राज्यात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. याबाबत सरकार जबाब द्यायला तयार नाही. सरकारने राज्याला बरबाद करून टाकले आहे. हे सरकार भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
 
काल देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्यासारखा 'एप्रिल फूल' साजरा केला गेला. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच शाहूंच्या नगरीत लोकांना मुर्ख म्हणजेच 'फूल' बनवले होते. २०१४ साली भाजप जाहिरातबाजी करून आणि खोटे बोलून सत्तेवर आले. तेव्हा देशात महागाई वाढली, असे दाखवले जात होते. पण आज काय परिस्थिती आहे? पेट्रोल, डिझेल, सिलेंडरचे भाव वाढवले आहेत. तरुणांना रोजगार नाहीत. जेव्हा तरुण रोजगाराबाबत भाजपला जाब विचारू लागले, तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले की भजी विका. ही तरुणांची चेष्टा चालवली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.