गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महिन्याला देशी दारूच्या फक्त 2 बाटल्या बाळगता येणार

मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारुबंदीसाठी केलेल्या सुचनांची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. आता ग्रामीण भागात दारु पिण्याचा परवाना असलेल्या मंडळींना महिन्याला देशी दारुच्या १२ बाटल्यांऐवजी फक्त २ बाटल्याच बाळगता येणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला आहे.
 
उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात ग्रामीण देशी दारुच्या बाटल्या बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. यापूर्वी दारु पिण्याचा परवाना असलेल्या मंडळींना देशी दारुच्या १२ बाटल्या बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती. अवैध दारुला आळा घालण्यासाठी आणि दारुबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला अनेक उपाय सुचविले होते. दारुच्या बाटल्या बाळगण्याची मर्यादा १२ वरुन दोनपर्यंत कमी करण्याची हजारे यांची सूचना होती. गेल्या आठवड्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशी दारु बाळगण्याची मर्यादा कमी करु असे सांगितले होते. वैयक्तिक सेवनासाठी दोन बाटल्या पुरेशा आहेत, असे सरकारचेही मत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते. मंगळवारी बावनकुळे यांनी परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला.