गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (15:43 IST)

सगळं बंद करण्याची उद्धव ठाकरे यांना काही हौस नाही

मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. 
 
“मुंबईत कोरोना रूग्णांचा अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणं गरजेचं आहे,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
 
उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.