शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पिंपरी , सोमवार, 20 मार्च 2017 (22:12 IST)

एकही पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद होणार नाही – शिक्षणमंत्री तावडे

राज्यातले कोणतेही पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद होणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी   स्पष्ट केले.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेमार्फत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पिंपरी येथील एच. ए. मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या डीपेक्स प्रदर्शनातील बक्षिस वितरण समारंभात
शिक्षणमंत्री तावडे बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष छगन पटेल, रामनिळकंठ भोगले, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
 
विनोद तावडे म्हणाले, “राज्यातील पॉलिटेक्निकची काही महाविद्यालये सरकार बंद करणार असल्याची भिती निर्माण केली जात आहे. त्याबाबत अफवा पसरवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. मात्र ही भिती निराधार असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केंद्र आणि राज्य सरकारने मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राचा नारा आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकचे कोणतेही महाविद्यालय बंद केले जाणार नाही. उलट अशा महाविद्यालयांची संख्या वाढविण्याचाच सरकारचा विचार आहे. पॉलिटेक्निकमधून तयार होणारा विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव घेणारा विद्यार्थी असतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात अशा विद्यार्थ्यांना मागणी असते. हेच विद्यार्थी पुढे मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र घडविणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”
 
या कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तावडे यांनी उत्तरे दिले.