शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (07:17 IST)

श्रावणातल्या अवसेच्या दिवशी पिठोरीची कहाणी नक्की वाचावी

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचा श्रद्धा असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्ष झालं. 
 
सातव्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यांत गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई- बाई तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आली तशी लवकर जा. नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली बाई- बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली. 
 
ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावस्याच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसासर्‍यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझी झाली. सातव्या खेपेला ही असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेला मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे? असं म्हणून रडू लागली. 
 
तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको अशी थोडी पुढे जा तिथं तुला एका शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या, देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीर-पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहते. कोण कोठून अशी चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. 
ब्राह्मणाच्या सुनेना बरं म्हटलं. तिथून उठली पुढं गेली. एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे- तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. नागकन्या, देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्या आणि तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरानी दाखविली. पुढे तिच्यासाठी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं.
 
पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं यांना काय होतं? आसरानी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत सुखा-समाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं. तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळा दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सूनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ सुनेवरुन आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हात- पाय धुऊन घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखाने नांदू लागली.
 
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.