शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

तुम्ही विसराळू आहात का?

प्रा. राजा आकाश

आपणच ठेवलेल्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्या ते आपल्याला आठवत नाही. आपण ठरवलेली महत्वाची कामं आपल्याला दिवसभर आठवत नाहीत, पण रात्री झोपताना आठवतात. ते इतकं महत्वाचं काम करायला आपण विसरलो म्हणून हळहळत बसतो.

आपल्या स्मरणशक्तीला दोष देतो. अनेक गोष्टी आपल्याला हव्या तेव्हा आठवत नाही म्हणून आपलं बरचं नुकसान होतं व आपण हतबल होत जातो. विज्ञानातीलं संशोधनं असं सांगतात की मानवी मेंदूची क्षमता ही स्नायूंसारखी असते. स्नायू जसे विशिष्ट व्यायाम करून विकसित करता येतात, त्यांची क्षमता वाढवता येते, त्याच पद्धतीने माणसाच्या मेंदूची क्षमतादेखिल विशिष्ठ तंत्र वापरून व सराव करून वाढवता येते.

'वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप' जिंकणारा डॉम्निक ओब्रायन नावाचा ४० वर्षाचा माणूस केवळ ५ मिनिटांमध्ये २४० आकडे अचूक लक्षात ठेवतो व केवळ ४२ सेकंदात ५२ पत्यांचा सिक्वेन्स एकही चूक न करता लक्षात ठेवतो. ओब्रायनला लोक विचारतात की तुझ्यात ही क्षमता कुठून आली तेव्हा तो म्हणतो की ही क्षमता माझ्यात जन्मजात नाही.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणामुळे हे साध्य झाले आहे. जे स्वतःची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात त्यांची स्मरणशक्ती वृद्धावस्थेतही कुशाग्र राहते. १४ वर्षाखालील सुमारे ३२ टक्के मुलांना स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते.

आजच्या काळात सतत माहितीचा ओघ आपल्यापर्यंत येत असताना स्मरणशक्ती वाढविणे या गोष्टीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो आपल्या स्मरणशक्तीचे कौशल्य सिद्ध करतो तो नेहमीच सर्वांच्या पुढे जातो. आपली परिक्षापद्धतही स्मरणशक्तीच्या क्षमतेवर आधारलेली आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे प्रगती जर करायची असेल तर आपल्याला स्मरणशक्ती जास्तीत जास्त वाढवावी लागेल.

प्रा. राजा आकाश
कंसल्टंट सायकॉलॉजिस्ट, नागपूर