उन्हाळ्यात उष्णता वाढते. बाहेरच्या उष्णतेबरोबरच शरीरातील उष्णताही वाढते. त्यामुळे या काळात शरीर थंड ठेवण्यासाठी आहारही तसा घ्यायला हवा.
थंडाई, ब्राह्मी, खस, चंदन, डाळिंब, मध, मोसंबी, लिंबू इत्यादींचे सरबत सकाळ व संध्याकाळी घ्यायला पाहिजे. जवसाच्या सत्त्वात साखर टाकून थंड पाण्यात मिसळून त्याचे सेवन करावे. हे पेय तृप्ती देणारे, पौष्टिक व थंड असते.
गर्मीत थंडावा देणारी दूध किंवा दह्याची लस्सी, ताक, नारळाचे पाणी, ऊसाचा रस व ताज्या फळांचा रस व लिंबाचे सरबत हे उत्कृष्ट पेय आहे. हे पेय पदार्थ दिवसांतून २-३ वेळा घेऊ शकता.
उन्हाळ्यात आंबट पदार्थ उदा. कैरी व चिंचसुद्घा उपयुक्त ठरतात. कैरीचे पन्हे गर्मीपासून बचावासाठी अवश्य घ्यावे. आवळासुद्घा शरीरातील उष्णता कमी करतो. आवळ्याचे सरबत, मुरंबा शरीर व मेंदूला थंडावा देतात. हे पदार्थ बाजारात मुबलकतेने उपलब्ध आहेत. कलिंगडाचे सेवन चांगले. पण सोबत दूध घेणे टाळावे. त्याच प्रकारे टरबूज, काकडी रिकाम्या पोटी घेणे हानिकारक असते. टरबूज व काकडी हे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतात.
उन्हाळ्यात बर्फाचे सेवन जास्त केले जाते. त्याने सुरवातीला छान वाटते. पण त्यामुळे दात कमजोर होतात. बर्फाऐवजी माठातील थंड पाणी वापरल्यास उत्तम. गर्मीतील जेवण- जवस, गहू, ज्वारीची पोळी, मुगाची, तुरीची व मसूरीच्या डाळीचे वरण, पातळ कढी, भात, दही किंवा ताक असे हवे. भाज्यांमध्ये - घोसाळी, चिवळीची भाजी कैरीसोबत, कांदे, शेवग्याच्या शेंगा इत्यादीचे सेवन केले पाहिजे. उन्हाळ्यात कच्चा कांदा, हिरवी कोथिंबीर व पुदिन्याची चटणी आतड्यांना थंडावा देतात.
दुपारच्या वेळी भूक लागल्यास फुटाण्यासोबत थंड पाणी घेतले पाहिजे. संध्याकाळचे जेवण शक्यतो हलके व कमी घेतल्यास फायदा मिळतो. रात्रीच्या वेळी झोपण्या अगोदर दूध घेतले पाहिजे. चहाचे सेवन शक्यतो टाळावे. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिल्यास शरीरास त्याचा फायदा होतो.
दुपारच्या वेळी १-२ तासाची झोप घेतल्यास आराम मिळतो व शरीर ताजेतवाने राहते. कूलर व एअरकंडीश्नरचा वापर जेवढे शक्य असल्यास तेवढा कमी करावा. उन्हाळ्यात पांढरे, सुती किंवा खादीचे कपडे वापरणे चांगले.
|