उन्हाळा आला की गार गार वाटावं म्हणून कोल्ड्रिंक्सच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या जातात. पण अनेक रसायने युक्त असणारी ही कोल्ड्रिक्स तात्पुरती बरी वाटत असली तरी ती शरीराला त्रासदायक आहेत. त्यापेक्षा नैसर्गिक फळे वा त्यांचा रस या काळात घेणे उत्तम. यातून पोषक घटकही मिळतात. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची पातळीही शरीरात राखली जाते.
प्रखर सूर्यकिरणांनी घाम येतो आणि घामामुळे शरीरात असलेले पाणी व इतर घटक बाहेर पडतात. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन झाल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि स्नायू ताणले गेल्यासारखे वाटतात. या तक्रारींपासून मुक्ती मिळवण्यासाठी फळांचे सेवन केले पाहिजे.
टरबूज - उन्हाळ्यात सर्वांत उपयोगी फळ म्हणजे टरबूज. यात भरपूर पाणी असते. शिवाय कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते.
सफरचंद - सफरचंदात सर्वांत जास्त फायबर असतात. या व्यतिरिक्त सफरचंदाच्या सालात एंटीऑक्सीडेंट घटक असतो. लोहही असते. यामुळे हे फक्त शरीरासाठीच नव्हे तर त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे.
खरबूज - खरबूजसुद्धा खास उन्हाळ्यातील फळ आहे, यामुळे शरीराला गरजेइतके पाणी मिळते. यात व्हिटॅमिन ए, सी, लोह, सोडियम आणि पोटेशियम असते.
बेरीज - यात स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज ही सर्व फळे येतात. या फळांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन 'सी' भरपूर असते.
आंबा - फळांचा राजा आंबा. हे तर सर्वांचेच आवडते फळ आहे. यात फायबर, बीटाकेरोटीन आणि व्हिटॅमिन 'सी' असते.
केळी - केळी शरीराला थंडावा देतात. शिवाय त्यात नैसर्गिक साखरही असते.
ज्यूस आणि सरबत द्राक्ष, टरबूज, केळी, फणस अननस आणि लिंबाचा रस उन्हाळ्याच्या दिवसांत लाभदायक असतो, हे स्फूर्तिदायक आहेत शिवाय लवकर पचतात.
|