'> मराठीच्या नवनिर्माणाचे 'राज'का'रण'
मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » मराठीच्या नवनिर्माणाचे 'राज'का'रण'
Feedback Print Bookmark and Share
 

  राज यांचा राग विशेष करून बिहारी व युपीवाल्यांवर आहे. पण मुंबईतील टॅक्सीवाल्यांना, रिक्षावाल्यांना मारून ते काय साध्य करू इच्छितात?      
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व समाजवादी पक्षाच्या नेत्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शाब्दिक वितंडवाद रविवारी रस्त्यावर आला आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. अर्थात सुरवात राज यांनीच केली होती. पण रविवारी झालेल्या देश बचाव रॅलीत मुलायमसिंह, अमरसिंह आणि अबू आझमी यांनी त्यात तेल ओतले. त्यातच राज यांनी अमिताभचे नाव घेतल्यामुळे तर समाजवादी पक्षाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यानंतर त्यांनी आणखी आगलावी वक्तव्ये केली. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळले आहे.

मुंबईत बिहारी व युपीमधून आलेल्या लोकांनी स्थानिकांचे व्यवसाय बळकावून घेतले आणि मुंबई आणखी घाण केली, असा सर्रास आरोप केला जातो. मनसेचाही मुद्दा तोच आहे. या उलट मुंबई हा या देशाचाच एक भाग असल्यामुळे आणि देशात लोकशाही असल्याने कोणीही कुठेही जाऊन स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. या परिस्थितीत प्रांतीयतेचा मुद्दा पुढे आला आहे.

raj
NDND
राज यांचा राग विशेष करून बिहारी व युपीवाल्यांवर आहे. पण मुंबईतील टॅक्सीवाल्यांना, रिक्षावाल्यांना मारून ते काय साध्य करू इच्छितात? केवळ त्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे का? यातून निर्माण होणारे इतर प्रश्न काय याचाही विचार व्हायला हवा. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विकास नसल्याने हे लोक महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात येतात. त्यांना तेथे रोजगार उत्पन्न झाल्यास हा लोंढा रोखला जाईल. मुंबईत त्यांचे येणे कोणत्या आधारावर रोखायचे? हा लोंढा रोखण्यासाठी त्या राज्यांचा विकास करणे जरूरीचे आहे.

  महाराष्ट्र मराठी लोकांचा ही घोषणा महाराष्ट्रातून इतर राज्यांत गेलेल्या मराठी लोकांसाठी अडचणीची ठरणार आहे. स्थानिकांचा रोजगार हिरावला म्हणून त्यांच्याविरूद्ध आंदोलन सुरू झाल्यास किंवा त्यांना तिथून हाकलून दिल्यास काय होईल?      
त्याचवेळी महाराष्ट्रात येऊन आपल्या भागातील लोकांचे येथे येण्याचे समर्थन करणारे बिहार व युपीचे नेते आगलावी वक्तव्ये करण्यापलिकडे काय करतात? उत्तर प्रदेशची उत्तम प्रदेश अशी भलावण करून त्यासाठी अमिताभला ब्रॅंड एम्बेसेडर बनविणार्‍या मुलायम व अमरसिंह यांनी राज्यासाठी काय केले? जिथे सामान्य माणूस सायंकाळी सुरक्षितपणे फिरूही शकत नाही, हीच तेथील कायदा सुव्यवथा. असे असताना देश बचाव रॅली काढण्यात काय मतलब? ज्यांना आपला प्रदेश वाचविता येत नाही, ते देश काय वाचविणार? त्या तुलनेत शिवसेनेने सुरवातीला दक्षिण भारतीयांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' असे आंदोलन केले होते. पण त्यानंतर त्या राज्यांचा विकास एवढा झाला की आता मराठी माणूस तेथे जातो आहे. आंध्र, कर्नाटक व तमिळनाडू, केरळच्या नेत्यांना जमले ते बिहार व युपीच्या नेत्यांना का जमत नाही?

पण त्याचवेळी राज यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे, की महाराष्ट्र मराठी लोकांचा ही घोषणा महाराष्ट्रातून इतर राज्यांत गेलेल्या मराठी लोकांसाठी अडचणीची ठरणार आहे. स्थानिकांचा रोजगार हिरावला म्हणून त्यांच्याविरूद्ध आंदोलन सुरू झाल्यास किंवा त्यांना तिथून हाकलून दिल्यास काय होईल? याचाही विचार केला पाहिजे. आज बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, म्हैसूर या आयटीच्या तीर्थक्षेत्री अनेक मराठी माणसे काम करीत आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतही मराठी ध्वजा फडकत आहेत. तेथे मराठी माणसाने काही विशेष कर्तृत्व केले की आपण त्याचे मराठी म्हणून गोडवे गातो. मग तेथून त्यांना हाकलल्यानंतर आपण त्यांच्या तेथे रहाण्याचे समर्थन कोणत्या शब्दांत करणार? अमेरिकेच्या सिटी ग्रुपचे अध्यक्षपद विक्रम पंडितांसारख्या मराठी माणसाला मिळते ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल, तर मग त्या ग्रुपचे अध्यक्ष होण्याइतकी पात्रता एकही अमेरिकन माणसांत नाही, याची खंत अमेरिकन लोकांनी बाळगायची का? याचा विचार करायला हवा.

  अमेरिकेच्या सिटी ग्रुपचे अध्यक्षपद विक्रम पंडितांसारख्या मराठी माणसाला अभिमानाची बाब असेल, तर मग त्या ग्रुपचे अध्यक्ष होण्याइतकी पात्रता एकही अमेरिकन माणसांत नाही, याची खंत अमेरिकन लोकांनी बाळगायची का? याचा विचार करायला हवा.      
विकास हा जात, धर्म आणि प्रांतनिरपेक्ष आहे. त्यामुळे विकास होईल, तेथे लोंढा जाणार हे तर नक्कीच आहे. मुंबई आणि परिसरात विकास होतो आहे, म्हणून जगभरातून लोक तेथे येत आहेत. आपल्याल्या ज्या पात्रतेचे मनुष्यबळ हवे आहे, ते आपल्याच भागात मिळाले नाही, तर ते इतर ठिकाणांहून आपल्याला मागवावे लागणारच आहे. येथेच तर जागतिकीकरण आपल्याला उपयोगी पडते आहे. जागतिकीरणानंतरच भारतीयांनी जगभर कर्तृत्वाच्या ध्वजा उभारल्या आहेत. त्यामुळे आपल्याइथे येतो म्हणून कुणाला विरोध करणे आपल्याला परवडणारे नाही.