1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By मनोज पोलादे|

विजय मराठी 'माणसा'चा की 'मनसे'चा?

IFMIFM
'जया बच्चन यांच्या वक्तव्यावर अमिताभ यांनी माफी मागितली असल्याने आपण संतृष्ट असून हा मराठी एकजुटीचा विजय आहे', असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांविरोधातील आंदोलन मागे घेतले.

'आम्ही युपीवाले आहोत तर हिंदीतच बोलणार, महाराष्ट्रातील लोकांनी आम्हांस माफ करावे', असे वक्तव्य करणाऱ्या जया बच्चन यांनी 'मराठी बाण्या'चा मुद्दा हाती घेतलेल्या राज यांना निवडणुकीच्या उंबरठ्यावर आयतेच कोलीत दिले. जया बच्चन यांनी मराठी व महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे सांगून बच्चन कुटुंबीयांचा एकही चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे जाहीर करून राज यांनी मराठी अस्मितेचे आंदोलन आणखी तीव्र केले होते. यानंतर अमिताभ यांनी ब्लॉग लिहून जयाच्या वक्तव्याने अनवधानाने मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आपण जाहीर माफी मागत असल्याचे स्पष्ट केले होते.

मनसेची पायाभरणी:
उद्रूव ठाकरे यांच्याशी मतभेदानंतर शिवसेनेतू
Gajanan GhuryeGG
बाहेर पडल्यानंतर राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात 'मनसे' अगदी नवखा म्हणजे अडीच वर्ष जुना पक्ष आहे. बृहनमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'मनसे' विकासाच्या मुद्दयावर आखाड्यात उतरल्यावर त्यांचे अवघे सात नगरसेवक निवडून येऊ शकले.

या अनुभवातून छोट्या प्रादेशिक पक्षांना विस्तार करायचा झाल्यास प्रादेशिक, भाषिक अस्मितेच्या मुद्दयांना हात घातल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. लहानपणापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या राज यांनी राज्यात शिवसेनेचा सत्ता प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास पाहिलेला असून सेनेतील तरूण फळीचे नेतृत्व करताना सेनेच्या यशात त्यांचा काही वाटाही होताच.

सेना विरूद्ध सेना:
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र बाळासाहेबांनी १९६६ मध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेची स्थापना केली होती. सुरूवातीस प्रादेशिक, भाषिक अणि नंतर हिंदुत्वाशी सलगी केल्यानंतर धार्मिक अस्मितेच्या मुद्दयावर रोखठोक भूमिका घेत त्यांनी महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून काढले होते. दक्षिण भारतीयांविरुद्धचे 'बजाव पुंगी हटाव लुंगी' आंदोलन हे त्याचेच उदाहरण. राज ठाकरेंनीही राज्याच्या राजकीय पटावर ठळक अस्तित्वासाठी मळलेली मात्र हमखास यशाची खात्री असणारी वाट निवडलेली आहे.

PRPR
शिवसेनेने मूळ धोरणापासून फारकत घेत पक्षविस्ताराच्या दृष्टीने सर्वसमावेशक धोरण घेतल्यानंतर राज यांनी सेनेचाच अजेंडा हायजॅक करून 'सेना विरूद्ध सेना' संघर्ष निर्माण केला आहे. फरक एवढाच की संदर्भानुसार दक्षिण भारतीयांऐवजी आता उत्तर भारतीयांना लक्ष केल्या जात आहे. अण्णांऐवजी भैय्या एवढाच फरक. मुंबई हे मुळात सुरवातीपासूनच मिश्र संस्कृती असलेले व्यापारी शहर आहे. भाषावर प्रांतरचनेअगोदर मुंबई हा स्वतंत्र प्रांत होता. देशभरात भाषावर प्रांतरचनेसाठी आंदोलनांनी उग्र रूप धारण केल्यानंतर केंद्रास भाषावर प्रांतरचना करणे भाग पडल्याने १ मे १९६० मध्ये मुंबई, विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आले.

शिवसेनेने त्याकाळीही नोकरी, उद्योग, व्यवसाय, कला, संस्कृती सर्वच क्षेत्रात स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मुद्दयावरून रणकंद माजवून तमाम मराठी भाषिकांची सहानुभूती मिळवण्यासोबतच कम्युनिस्टांची हकालपट्टी करत कामगार संघटनांचे नेतृत्व आपल्याकडे घेतले होते. यातूनच मुंबईत सेनेचे समांतर सरकार अस्तित्वात आले होते. मात्र नव्वदच्या दशकात सेनेने मराठीची कास सोडून हिंदुत्वाशी घरोबा केल्यानंतर आणि जागतिकीकरण व आर्थिक सुधारणांच्या सर्वांगीण क्षेत्रात झालेल्या बदलानंतर मराठी भाषिक महानगरातून थेट उपनगरात कधी फेकला गेले हे सेनेच्याही लक्षात आले नाही.

मराठी कामगारांचे वर्चस्व असलेला गिरणी उद्योगही मुळातून उपटल्या गेला. महानगरात संक्रमणकाळात एकेक क्षेत्र परप्रांतीयांच्या हाती गेले. मराठी माणूस चाकरमान्या तो चाकरमान्याच राहिला. मुंबईच्या सामाजिक संरचनेनुसार येथे सुरूवातीपासूनच कोण्या एका भाषेची मक्तेदारी राहिलेली नाही. बॉलीवूडचा प्रभाव आणि त्यातच भाषिक विविधतेमुळे बहुसंख्यांकांना समजणार्‍या हिंदीचे चलन वाढले.

विजय कुणाचा?
शिवसेनेच्या मराठी माणसाच्या हक्कांसाठीच्या आंदोलनापासून 'मनसे'च्या मराठी बाण्याच्या आंदोलनापर्यंतच्या ४२ वर्षाच्या प्रवासात मराठी माणसाचे प्रश्न, समस्या अजूनही त्याच आहेत. राज ठाकरेंनी निवडणुकीच्या वर्षात प्ररप्रांतियांविरूद्ध
  राज ठाकरेंनी निवडणुकीच्या वर्षात प्ररप्रांतियांविरूद्ध मराठी अस्मितेचे तीव्र आंदोलन छेडल्यापासून मुंबईत मराठी भाषेची सक्ती, मराठी पाट्यांचा मुद्दा, स्थानिकांना सरकारी व खाजगी उद्योगात ऐंशी टक्के आरक्षण यासारखे मुदयांनी आंदोलनातील धग कायम ठेवली आहे.      
मराठी अस्मितेचे तीव्र आंदोलन छेडल्यापासून मुंबईत मराठी भाषेची सक्ती, मराठी पाट्यांचा मुद्दा, स्थानिकांना सरकारी व खाजगी उद्योगात ऐंशी टक्के आरक्षण यासारखे मुदयांनी आंदोलनातील धग कायम ठेवली आहे. परप्रांतीयाचे महाष्ट्रातील योगदान, त्यांची निष्ठा यासारखे संवेदनशील मुद्देही चघळले गेल्याने अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांच्यासारख्या कलाक्षेत्रातील व्यक्तींवरही शाब्दिक हल्ले झाले.

मात्र, विचार केल्यास यातून कुणासाठीच काही ठोस निष्पन्न झाल्याचे चित्र नसून भाषिक, प्रांतीक कटूता निर्माण होण्यातच या आंदोलनांची परिणती होण्याची शक्यता आहे. अस्मितेच्या आंदोलनाच्या झपाट्यात 'मनसे' सारख्या नवख्या राजकीय पक्षांच्या झोळीत मतांचे वजन वाढून त्यांचा पाया मजबूत होईल, मात्र एक प्रश्न निरूत्तरीतच राहणार विजय कुणाचा 'मराठी माणसाचा की 'मनसेचा'?