शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

ज्येष्ठ विचारवंत भास्कर भोळे यांचे निधन

दीर्घ काळापासून आजारी असलेले प्रख्यात राजकीय समीक्षक, ज्येष्ठ विचारवंत आणि नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. भास्कर लक्ष्णम भोळे यांचे आज सकाळी नागपुरात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षांचे होते. सायंकाळी अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. भोळे आजारी होते. अंबाझरी मार्गावरील व्होकार्ट या अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. शेवटी आज सकाळी ११.४५ च्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे पत्नी विजयाताई, मुलगा हिरणमय, मुलगी गौरी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मृत्युसमयी त्यांच्याजवळ पत्नी आणि मुलगा उपस्थित होते.

त्यांच्या निधनाच्या वृत्ताने नागपुरातील आणि विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी दुःख व्यक्त केले. शहरातील अनेक नामवंत लोकांनी प्रतापनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. त्यात ख्यातनाम नाट्यलेखक महेश एलकुंचवार, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते मनोहर म्हैसाळकर, पत्रकार चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार, डॉ. वि. स. जोग, गिरीश गांधी, प्रफुल्ल शिलेदार, सुमती देव, शुभदा फडणवीस प्रभृतींचा समावेश होता.

डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे यांचा जन्म ३० सप्टेंबर १९४२ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील तालखेड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथून झाले. राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यावर काही काळ त्यांनी औरंगाबाद येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. भारतीय शेतकरी कामगार पक्ष या विषयावर त्यांनी पीएचडी. घेतली. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षवाद, विवेकवाद आणि सामाजिक न्याय या तत्वांशी बांधिलकी स्वीकारून त्यानी सामाजिक कार्यात उडी घेतली. महाराष्ट्रातील सर्वच पुरोगामी चळवळी, संस्था, उपक्रम आणि व्यासपीठांशी त्यांचा जवळचा संबंध होता. लेखन व भाषणाची शक्ती ओळखून त्यांनी याचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी केला. जे लिहायचे, जे बोलायचे ते मराठीतूनच यावर त्यांचा नेहमी भर असायचा.

आपल्या कार्यकाळात डॉ. भोळे यांनी विपूल ग्रंथ संपदा लिहिलेली असून, त्यात नवी घटना दुरुस्ती अन्वय आणि अर्थ, दुसरे स्वातंत्र्य, राजकीय भारत, सत्तांतर आणि नंतर, यशवंतराव चव्हाण-राजकारण आणि साहित्य अशा काही प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या डॉ. भोळे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ ग्रंथाकरिता राज्य पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव व आठवणी या ग्रंथाला उत्तम अनुवादित वाङमय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचा सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक, नागपूरच्या जिजामाता सावित्री स्मृती ट्रस्टतर्फे दिल्या जाणारा फुले शाहू आंबेडकर स्मृती पुरस्कार, मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

मराठवाड्यातून नागपुरात आलेल्या भोळेंनी नागपूरच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर आपला ठसा तर उमटवलाच. पण, संपूर्ण महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने एक सामाजिक विचारवंत हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.