1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (18:48 IST)

सुमित्रा महाजन : चिपळूणच्या रामकथा किर्तनकार, लोकसभा अध्यक्ष ते पद्मभूषण पुरस्कार

अनिल जैन
ज्येष्ठ पत्रकार, बीबीसीसाठी
इंदूर नगरपालिकेत वरिष्ठ नगरसेवक ते शहराच्या उप-महापौर ते केंद्रीय मंत्री आणि सरतेशेवटी लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या सुमित्रा महाजन यांना नुकताच भारत सरकारचा पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
सुमित्रा महाजनांचा जन्म महाराष्ट्रातल्या चिपळूणमध्ये 12 एप्रिल 1943 साली झाला एका कोकणस्थ ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्या पूर्वाश्रमीच्या सुमित्रा साठे.
 
1965 साली त्या जयंत महाजन यांच्याशी लग्न करून इंदूरला आल्या. इथेच त्यांनी एमए आणि एलएलबीच्या पदव्या घेतल्या. याच दिवसात रामायणावर सुरस कीर्तन करणाऱ्या मैनाताई गोखलेंच्या संपर्कात त्या आल्या. पुढे जेव्हा मैनाताईंचं कीर्तन करणं वृद्धावस्थेमुळे थांबलं तेव्हा सुमित्रा महाजन यांनी ते काम हाती घेतलं. कीर्तनकार ही त्यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात होती.
 
याच काळात त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्र सेविका समिती आणि महाराष्ट्र भगिनी मंडळात सक्रिय झाल्या.
 
सन 1982 साली इंदूरच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं त्यावेळस त्या नगरपालिकेत नगरसेवक बनल्या. 1984 साली त्या उपमहापौर बनल्या.
 
याच लहानशा राजकीय करियरच्या जोरावर 1985 साली त्यांना भाजपने इंदूर क्रमांक तीन प्रभागातून विधानसभेचं तिकीट दिलं. या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे दिग्गज महेश जोशी यांनी पराभूत केलं.
 
निवडणूक हरल्यानंतर त्या पुन्हा आपल्या कीर्तनकाराच्या भूमिकेत परतल्या त्याचबरोबर मराठी ब्राम्हण समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होत राहिल्या. त्यावेळी कोणाला कल्पनाही नव्हती, अगदी स्वतः सुमित्रा महाजनांना, की राजकारण त्यांची वाट पाहातंय आणि त्यांनी मोठी इनिंग खेळायची आहे.
 
1989 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदूरच्या सगळ्या दिग्गज नेत्यांना मागे सारत पक्षाने त्यांना आपला उमेदवार घोषित केलं. त्यांना उमेदवारी देण्यात भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष कुशाभाऊ ठाकरेंची महत्त्वाची भूमिका होती. ठाकरेंना जनसंघाच्या काळापासूनच मध्यप्रदेशातल्या पक्षाचा पितृपुरुष समजलं जात होतं.
 
सुमित्रा महाजनांनी लोकसभेत सलग आठ वेळा इंदूरचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात 1989 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री असणाऱ्या प्रकाशचंद सेठी यांचा पराभव करून केली.
 
इंदूर लोकसभेच्या जागेवर भाजपचा हा पहिला विजय होता. याआधी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला समजली जात होती.
 
इतिहास रचणारी महिला

प्रकाशचंद सेठींचा सुमित्रा महाजनांकडून पराभूत झाले आणि इतिहास रचला गेला. याआधी याच जागेवरून ते चार वेळा निवडून आले होते.
त्यानंतर सलग आठ वेळा सुमित्रा महाजन इंदूरचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान 2002 ते 2004 या काळात त्या अटलबिहारी वाजेपायी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या एनडीए सरकारमध्ये राज्यमंत्रीही होत्या. 2014 मध्ये त्या 16 व्या लोकसभा अध्यक्ष बनल्या.
 
अर्थात प्रत्येक निवडणुकीत मिळालेल्या यशाचा हा अर्थ मुळीच नाही की त्या आपल्या मतदारसंघातल्या समस्यांविषयी जागरूक होत्या किंवा त्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
 
75 चा आकडा पडला भारी

1989 साली निवडून गेल्यानंतर सुमित्रा महाजनांना आपल्या उमेदवारीसाठी कधी खूप मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांना विनासायास तिकीट मिळत गेलं. 2019 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना तिकीट मिळालं नाही कारण पक्षाने 75 पेक्षा वयाने जास्त असलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं नाही.
 
लोकसभा अध्यक्षाने निष्पक्ष असणं अपेक्षित असतं, पण ते सहसा सरकार आणि सत्तारूढ पक्षाच्या बाजून झुकलले आढळून येतात. सुमित्रा महाजनांवर अनेकदा पक्षपातीपणाचे आरोप झाले.
 
लोकसभेच्या इतिहासात सुमित्रा महाजन यांच्या आधी बलराम जाखडच सर्वाधिक पक्षपाती लोकसभा अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. पण सुमित्रा महाजन यांनी त्यांनाही मागे टाकलं.
 
ते काहीही असलं आणि सुमित्रा महाजन यांच्या राजकीय कारकीर्दीला पूर्णविराम लागला असला तरी पण आठ वेळा सलग निवडून येणारी महिला खासदार हा गौरव त्यांच्या नावे लिहिला गेलाय हे मात्र खरं.