मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By

स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त: स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र

करियर मेकर्स अकँडमी, मुंबईचे संचालक, प्रा. संजय मोरे यांचे, स्पर्धा परिक्षेबाबतचे अभ्यासतंत्र शिकविणारे, ‘व्यक्तिमत्व विकास’ यांवर आधारित ‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ हे पुस्तक, स्पर्धा परिक्षेला सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे. प्रा. संजय मोरे यांचे स्पर्धा परिक्षां बाबतचे मार्गदर्शन झी २४ तास, सह्याद्री, आकाशवाणी मुंबई या वाहिन्यांवर सहक्षेपित झालेले आहे. अनेक नामांकित वर्तमानपत्रातून त्यांनी स्पर्धा परिक्षांबाबतचे स्तंभलेखन केले आहे. संपूर्ण महराष्ट्रात ७५०० हून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत व त्यांच्या अकँडमीतील १०००० हून अधिक व्यक्ती सरकारी व बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
 
स्पर्धा परिक्षांबाबतचे अनमोल मार्गदर्शन, अभ्यासतंत्र यावर आधारलेले ‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकात प्रा.संजय मोरेंनी केले आहे. या संग्रहाचे प्रकाशन जयसिंगपूर येथील नामांकित 'कवितासागर' प्रकाशनाने केले आहे. "स्पर्धा परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेखसंग्रह" असून यासाठी लेखक व संपादक मंगेश विठ्ठल कोळी यांची बहुमोल प्रस्तावना लाभली आहे.
 
प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘आजच्या तरूण पिढीत स्पर्धा परिक्षा हा शब्द माहित नाही असा एकही तरूण भेटणार नाही. अनेकांचे स्वप्न सरकारी नोकरी मिळवणे, आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायचे असते. ते मिळविण्यासाठीची जिद्दही असते पण त्यासाठी लागणारे परिश्रम, संयम या गोष्टीही अंगीभूत असणे गरजेचे असते. स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी, त्यासाठी लागणारी मानसिक, शारिरीक तयारी, ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार गरजेचा असतो असेही ते प्रस्तावनेत सांगतात. कृती, सवय, परिणाम हे स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचे समीकरणं त्यांनी प्रस्तावनेत सांगितली आहेत.
 
वेळेच्या सदुपयोगाबद्दल सांगताना मंगेश कोळी म्हणतात, विद्यार्थ्यांनी बारावी ते पदवीपर्यतचा  सुट्टीचा काळ मौज -मजेत न घालवता, स्पर्धा परिक्षेतील विविध घटकांचा अभ्यास करण्यात घालविला तर ते पदवी पूर्ण होताच कोणत्याही स्पर्धा परिक्षेसाठी तयार असतील, त्यांना यामुळे अधिकचे कष्ट पडणार नाहीत. त्यांनी याबाबत आणखी स्पष्ट करताना, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या ‘शांततेच्या काळात जास्त घाम गाळल्यास, युद्धाच्या काळात जास्त रक्तपात होत नाही’  यांच्या सुंदर वाक्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. स्पर्धा परिक्षा जिंकण्यासाठी चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम हे गुण महत्वाचे असल्याच त्यांनी सांगितले आहे. आजकाल विद्यार्थ्यांमधला संयम ढळत असून, त्यांना लगेचच रिजल्ट पाहिजे असतो. पण तसं नाही झाले की नकारात्मक दृष्टीकोण त्यांच्यात वाढीस लागून, त्याचे रूपांतर नैराश्यात होत असल्याचेही ते सांगतात. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना त्याचा अभ्यासक्रम, गणित, इंग्रजी, बुद्धीमत्ता, विज्ञान, चालू घडामोडी या विषयांची तयारी करणे महत्वपूर्ण असल्याचे ते प्रस्तावनेत सांगतात. लेखक संजय मोरे यांचे पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांला स्पर्धा परिक्षेत यश मिळण्यात मदत करेल असेही ते म्हणतात.
 
मनोगतात लेखक संजय मोरे यांनी ‘स्पर्धेशिवाय प्रगती नाही’ असे म्हटले आहे. त्यांनी कित्येक ठिकाणी व्याख्यान देताना विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परिक्षेबाबतची भीती असल्याचे सांगितले आहे. त्याचे कारण स्पर्धा परिक्षा बाबतची माहिती नसणे, कमीच माहिती असणे, स्पर्धा परिक्षांबाबतचे गैरसमज असणे असल्याचे ते मनोगतात सांगतात. स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अभ्यासतंत्र त्यांनी या पुस्तकात लिहील्याचे ते म्हणतात.
 
‘स्पर्धा परिक्षेचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकात, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त असे एकूण १६ लेख आहेत.
 
स्पर्धा परिक्षा-नोकरीचा राजमार्ग: या लेखात लेखक स्पर्धा परिक्षा नोकरीचा राजमार्ग असल्याचे सांगतात. सध्याच्या काळात ‘करियर नियोजनाचे’ महत्वही त्यांनी सांगितले आहे. बदलत्या काळानुसार करियरच्या वाटा बदलत असून, जो  योग्य वाट निवडतो तोच उत्तम करियर घडवितो असे ते सांगतात. सरकारी नोकरीच्या शोधात असणा-यासाठी स्पर्धा परिक्षा हे एक उत्तम माध्यम असल्याचे लेखक संजय मोरे या लेखात सांगतात.
 
स्पर्धा परिक्षा जिंकण्यासाठी: या लेखात लेखक संजय मोरेंनी स्पर्धा परिक्षा जिंकण्यासाठी चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम या गुणांचे महत्व पटवून दिले आहे. या गुणांनी कोणताही सामान्य व्यक्ती आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो असे ते म्हणतात. ऐन उमेदेतील काळ सुवर्णकाळ असतो, तो एकदा गेला की परतुन येत नाही. म्हणूनच या काळाचं सोनं करणं गरजेच आहे. हा ध्येयनिश्चितीचा काळ असल्याचे ते म्हणतात शिवाय या काळात जो कृती करून वाटचाल करतो तोच आयुष्याची स्पर्धा जिंकतो असंही ते या लेखात सांगतात.
 
स्पर्धा जिंकण्यासाठी चांगल्या गोष्टींची पूर्तता करणे, दूरदृष्टी असणे, अपयश आले तरी पुढे नव्या उमेदीनं,  संधी न दवडता पुढे जाण्यात आहे अस ते सांगतात. एकाग्रता या महत्वपूर्ण गुणाचे महत्वही त्यांनी या लेखात सांगितले आहे. स्पर्धा परिक्षांबाबतचे शंका निरसन वेळीच होणे गरजेचे असल्याचे ते सांगतात. उमेदवारांमध्ये संयम, सहनशीलता हे गुण अतिशय महत्वपूर्ण असल्याचे ते या लेखात सांगतात.
 
अपयश पचवून पुन्हा नव्या उमेदीनं उभारू पाहणा-या तरूणांसाठी  एक प्रेरणादायी उदाहरण देताना लेखक संजय मोरे म्हणतात, ‘अरविंद इनामदार हे स्वत: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी होणा-या परिक्षेत अपयशी झाले. परंतु त्यांनी अपयश पचवून युपीएससीची परिक्षा देऊन ते आयपीएस झाले आणि त्यामुळेच ते महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक होवू शकले.’
 
या उदाहरणावरून स्पर्धा परिक्षेत अपयश आलेल्या तरूणांना जणू नवप्रेरणाच लेखकाने या लेखात दिली आहे. स्पर्धा जिंकण्यासाठी स्वप्नरंजन न करता प्रत्यक्ष कृती आवश्यक असल्याचं ते सांगतात. चिकाटी, सातत्य या गुणांचेही महत्व त्यांनी या लेखात सांगितले आहे.
 
स्पर्धा परीक्षा - नियोजन: ‘If you fail to Plan, You plan to fail’  या वाक्याद्वारे लेखकाने ‘स्पर्धा परीक्षेच्या सुयोग्य नियोजनाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे ते या लेखात सांगतात. स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम पाहून योग्य नियोजन करण्याचा सल्लाच त्यांनी या लेखात स्पर्धा परिक्षेसाला सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांसाठी दिला आहे. विविध विषयांतील घटक, चालू घडामोडी करिता वर्तमानपत्राचे वाचन, त्याचे नियोजन, नोंदी ठेवणे या बाबींचे विशेष महत्वही त्यांनी या लेखात सांगितले आहे. गणिताचा अभ्यास करताना, गणितातील संबोध, नियम, सूत्रे अचूकता, गती, गणितातील शाँर्टकट्स पद्धतीचा अवलंब, दररोज किमान ३० उदाहरणे सोडवण्याचा सराव, त्याचे नियोजन याबाबतचे महत्व त्यांनी या लेखात सांगितले आहे. ‘टाईमपास आयूष्यात नापास’  म्हणत त्यांनी वेळेचे महत्व सांगितले आहे. मला जमणार नाही, मी हे करू शकत नाही, हे मी नंतर करीन, मूड नाही, माझ नशीब चांगल नाही हे तुमचं आयुष्य नकारात्मक बनवतात असे लेखक म्हणतात. सकारात्मक दृष्टीकोण स्पर्धा परिक्षेतील यशात महत्वाची बाब असल्याचे लेखक सांगतात.
 
‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकात प्रा. संजय मोरेंनी स्पर्धा परिक्षेसाठी अतिशय सुंदर, सहज, साध्या भाषेत अभ्यासतंत्राचे मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकात इतरही महत्वपूर्ण लेख आहेत. करीयर घडवा दिवाळीच्या सुट्टीत, करिअर योग्य दिशेने, टाईमपास आयुष्यात नापास, बारावी ते पदवी परिक्षेनंतरचा सुट्टीचा काळ व करिअरची तयारी, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षा, स्पर्धा परिक्षा - अभ्यास आणि कौशल्य, स्पर्धा परिक्षा - अभ्यास तंत्र व क्षमता, स्पर्धा परीक्षांसाठीची भूमिका व पूर्वतयारी, स्पर्धा परिक्षांतील गणिताची तयारी, मराठीचा सराव व आत्मविश्वास, लक्ष्य सरकारी नोकरी, स्पर्धा परिक्षा -मानसिकता सक्सेस मंत्र आदि स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शनपर, उपयुक्त लेख या पुस्तकात आहेत.
 
स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांनी नक्कीच वाचावा असा हा ‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ व्यक्तिमत्व विकासावर आधारित संग्रह आहे. प्रा. संजय मोरे यांनी या संग्रहाद्वारे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षांबाबतचे शंका निरसनच केले आहे. त्यांच्या या पुढील  लेखन कार्याला, विद्यार्थ्यांच्या करियर घडविण्याच्या मोलाच्या मार्गदर्शनपर कार्याला खूप-खूप शुभेच्छा !
 
लेखक - प्रा. संजय मोरे,  करियर मेकर्स अकँडमी,