शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

चतुराय नमः।

स्थापिती प्रथमारंभी। तुज मंगलमूर्ती॥
विघ्ने वारुनि करिसी। दीनेच्छा पुरती॥
ब्रह्मा-विष्णु-महेश तिघे। स्तुति करिती॥
सुरवर मुनिवर गाती। तुझिया गुणकीर्ती॥
 
श्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर माणिकदासांनी अनेक पदरचना केल आहेत. वरील आरती त्यांनीच रचिली आहे. या आरतीत गणपतीचे सर्व देवांमध्ये असलेले उच्चस्थान ते दर्शवितात. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी श्री गणेशाला स्थापिले असता कार्याचा नाश असंभव आहे. मुळातच गणपती हा सकल मंगलाची मूर्ती आहे. रामायण काळात गणपतीचे गुण वर्णन करण्यासारखे आहे. भोलेनाथांनी रावणाला आपले आत्मलिंग दिले. रावण क्रूर, दुष्ट प्रवृत्तीचा असल्याने त्याचा वाईट उपयोग करेल, या भीतीने सर्व देव विष्णूंकडे गेले असता त्यांनी हे काम  गणेशाकडे सोपविले. श्री गणेश हा युक्तीने आत्मलिंग परत आणेल ही खात्री विष्णूंना होतीच. त्याप्रमाणे श्री गणेशाने मोठ्या चातुर्याने रावणाकडून आत्मलिंग आपल्याकडे घेतले आणि ते जमिनीवर स्थिर केले. यावेळी श्री गणेशाने शक्तिशिवाय चातुर्याच्या जोरावर लिंग रावणाच्या हातून काढून घेतले म्हणून त्याला 'चतुरा नम:' असे नमन केले आहे.
 
असा महाराजा विघ्ने दूर करून दीनांची इच्छापूर्ती करतो आणि म्हणूनच ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिघेही त्याची नेहमीचस्तुती करतात.
 
एकदंता स्वामी हे वक्रतुंडा।
सर्वाआधी तुझा फडकतसे झेंडा॥
लप लप लप लप लप लप हालीव गजशुंडा।
गप गप मोदक भक्षिसी घेऊनि करी उंडा॥
 
रावणाकडून आ‍त्मलिंग आणतेवेळी श्री गणेशाला सगळ्याच देवांनी आयुधे अर्पण केली. शंकरांनी त्रिशूळ दिला. विष्णूंनी परशू, ब्रह्मदेवांनी पाश तर इंद्राने दंड दिला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्वती मातेने गणेशाला सर्वात जास्त आवडणारे मोदक दिले. हे मोदक षड्‌रिपूंपासून वाचविणारे आहेत. एकदंताला हे सारे आवडणारे आहेत. हे मोदक भक्तांना बुद्धी प्रदान करणारे आहेत. गूळ-खोबरे भक्तांचे  बल वाढविणारे आहे आणि म्हणूनच भक्तांनी गूळ-खोबरे खाणे गरजेचे आहे. 
 
शक्तिशाली व सुदृढ शरीर प्रदान करणारे हे पदार्थ आहे. श्री गणेशाचा आहार हा भक्तांसाठी वरप्रदच आहे.
- विठ्ठल जोशी