गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

काळाला नमन करण्याचा दिवस

सण म्हणजे आनंद व्यक्त करण्याचे माध्यम आहे. किंबहूना सणांचा हेतूच तोच आहे. पण त्याचवेळी हे सण का सुरू झाले याचाही कुठे तरी शोध घेतला पाहिजे. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. त्या दिवसापासून काळाने चालणे सुरू केले. म्हणजे जो काळ आपण आज मोजतो, त्याचा आरंभबिंदू हा होता. किती चांगली कल्पना आहे? खरे तर त्यामागची कल्पनाही किती छान आहे? एकसमान गतीने चालणारा काळ सुरू झाला, त्यावेळची स्थिती काय असेल? तो ज्या गतीने सुरू झाला तीच त्याची आजचीही गती आहेत. दिवस रात्रे कुस बदलत आहेत. काळ चालतोच आहे. तो कधीही थांबणार नाहीये. कारण ज्या दिवशी तो थांबेल, त्या दिवशी सगळेच थांबेल. ही पृथ्वी निश्चेष्ट होऊन पडेल. सगळे काही जड, अचेतन होऊन जाईल. कल्पना सुद्धा तरी किती भयंकर वाटते? 

म्हणूनच हा काळ चालतोय, म्हणून त्याला नमस्कार करण्यासाठी हा सण आहे. ब्रह्मानेच या दिवशी मनुष्य प्राण्याची निर्मिती केली. कोट्यावधी वर्षांपूर्वी माणसाने पृथ्वीवर जन्म घेतला त्यावेळी तो गुढी पाडवा म्हणून त्याच्या लेखी त्याचे काहीही महत्त्व नसेल. कारण त्यासाठी जगण्याचा संघर्षच समोर ठाकला होता. गुढी पाडवा हा पुढे उत्क्रांत होत गेलेल्या सभ्य आणि सुसंस्कृत समाजातून जन्माला आला आहे.

पण ब्रह्माने मनुष्याला जन्माला घातल्यानंतरही त्याने आपसांत भेदभाव करून एक वर्गविहीन, वर्णविहीन समाज अस्तित्वात येऊ दिला नाही. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या पृथ्वीची तर आपण वाट लावायला घेतलीच आहे. प्रदुषण आणि पर्यावरणाला धोका होईल, असे 'उद्योग' करून ब्रह्मदेवाच्या मूळ उद्दीष्टांनाच हरताळ फासायला घेतला आहे. ही पृथ्वी ब्रह्मदेवाने निर्माण केली असली, तरी तिच्यावर आम्ही रहात आहोत. त्यावर आमचा अधिकार आहे. कारण तिला रहाण्यायोग्य आम्ही बनविले आहे. आम्हीच इथले मूळ रहिवासी आहे, असे सांगून आपण ब्रह्मदेवालाच 'परप्रांतीय' ठरवले आहे. फक्त त्याच्या उपकारापुरता आपण 'गुढीपाडवा' साजरा करतो.

खरे तर गुढीपाडवा आनंदाचा, उत्सवाचा प्रतीक असला तरी तो बदलाचेही प्रतीक आहे. शेतकर्‍यांसाठीही तो महत्त्वाचा आहे. आंध्र प्रदेशात 'उगादी' (युगाब्धी) चा प्रारंभ याच दिवशी होतो. सिंधी समाजात भगवान झुलेलाल यांचा जन्मदिवस अर्थात चेट्रीचंड याच दिवशी असतो. सप्तऋषी संवत अनुसार काश्मीरमध्ये नवरेह म्हणून नववर्षाचा प्रारंभ होतो. इतिहासात याच दिवशी सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य यांनी शकांवर विजय प्राप्त केला. म्हणून विक्रम संवत सुरू करण्यात आले.