शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (00:06 IST)

आरती करण्याची पद्धत

करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजविणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. भक्ताच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे 'आरती'. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश नि:संशय सफल होतो, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजे अंत:करणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्यासाठी आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे, काय आवश्यक आहे? 
 
आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा. शंख वाजवताना मान वर करून डोळे मिटवून वाजवावा.
 
शंख वाजवताना शक्यतो आधी श्‍वास पूर्णत: छातीत भरून घेऊन मग एका श्‍वासात वाजवावा.
 
शंखनाद झाल्यानंतर आरती म्हणायला प्रारंभ करावा.
 
देव प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहोत या भावाने आरती म्हणावी.
 
आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.
 
आरती म्हणताना शब्दोच्चार स्पष्ट आणि योग्य असावा.
 
आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात. ताल धरण्यासाठी त्या हळुवारपणे वाजवाव्यात.
 
टाळ्यांच्या जोडीला घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे. असल्यास टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.
 
आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वतरुळाकृती फिरवावे.
 
आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये.
 
आरती झाल्यानंतर 'घालीन लोटांगण..' ही प्रार्थना म्हणावी.
 
यानंतर 'कपरूरगौरं करुणावतारं..' हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
 
त्यानंतर कापूर-आरती ग्रहण करावी. ते करताना ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपयर्ंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
 
त्यानंतर देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
 
मग देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वत:भोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
 
यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
 
मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवाच्या चरणांवर फूल आणि अक्षता वाहाव्यात.
 
नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
 
त्यानंतर तीर्थ प्राशन करून विभूती (उदबत्तीची राख) भ्रूमध्यावर लावावी.