बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2020 (13:17 IST)

कैसे करू ध्यान....

वरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण करतो त्यात कधी कधी आपली फसगत होते आणि मुळात अतिशय सात्विक, शुध्द म्हणून केलेली गोष्ट आपल्या बेसावधपणामुळे केव्हा यांत्रिक होईल सांगता येत नाही. 
 
अ) माझ्या पाहण्यात एक आजोबा होते. अतिशय कर्मठ, सोवळं ओवळं पळणारे. एकदा पूजा करीत असताना तुळशीला पाणी घालायला अंगणात गेले आणि त्यांचा पाय रस्त्यातल्या चपलेवर पडला. त्यांच्या रागाचा पारा जो वर गेला तो दिवसभर तसाच राहिला. एवढा वेळ पूजा केल्याचे सात्विक भाव कुठल्या कुठे गेले. घरच्यांना मनस्ताप झाला तो निराळाच.
 
ब ) एक राजा मोहिमेवर असताना तंबूवर तळ ठोकून ईश्वराच्या ध्यानास बसला होता. तेवढ्यात एक तरूणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी अधीरतेने जात असताना तिचे राजाकडे लक्ष गेले नाही आणि राजा बसलेल्या सतरंजीच्या टोकावर पाय देवून ती पुढे गेली. हे पाहून राजा संतापला नी तिच्यावर ओरडला. ते बघून ती तरूणी म्हणाली " 
 
माफ करा, मी सामान्य माणसाच्या प्रेमात पडले तर मला आसनाचेही भान राहिले नाही आपण तर ईश्वराच्या ध्यानात असता तर तुम्हाला मी किंवा सतरंजी दिसली नसती. राजा खजील झाला.
 
क ) एक गृहस्थ परदेशात काही कामानिमित्त गेले असता रोज दासबोधाचे नित्यनियामाने वाचन करीत असत. परंतु भारतात परत आल्यावर त्यांच्या वाचनात खंड पडला. 
 
गुरुंना त्यांनी विचारले असता त्यांना उत्तर मिळाले "वेळ मिळत नाही ही गोष्ट खरी नाही. तिथे तुम्ही भक्ति मुळे वाचत होता हे ही खरे नाही परदेशात तुम्ही एकटे होतात त्या भयापोटी वाचन झालं. आता आपल्या परिचितांत आल्यावर भय कमी झालं म्हणून वेळ कमी मिळू लागला आणि वाचनही सुटलं.
 
आपण म्हणतो देवाचं इतकं केलं पण (अपवाद वगळता) खरी अपेक्षा मान मान्यतेची, यशाची आणि सुरक्षिततेची असते. अशातून खरं समाधान मिळणे दुरापास्तच असतं.

विनीत - स्नेहल खंडागळे