गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (12:40 IST)

मोदी सरकारमध्ये 4 वर्षांत भूकबळीत मोठी वाढ

भूकबळी संपविणार्‍या देशांच्या यादीत भारत आणखी पाठीमागे पडला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 चा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार 119 देशांच्या यादीत भारत 103 व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गतवर्षी या यादीत भारत 100 व्या स्थानावर होता. त्यामुळे, मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यात अपयश ठरत असल्याचे दिसून येत आहे. 
 
केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी समस्या आव्हान ठरताना दिसत आहे. कारण, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत सातत्याने मागे पडत आहे. भूकबळी संपविणार्‍या देशांच्या या यादीत 2014 साली भारत 55 व्या स्थानावर होता. त्यानंतर, सन 2015 मध्ये हे स्थान 80 पर्यंत जाऊन पोहोचले होते, तर 2016 मध्ये 97 आणि 2017 मध्ये 100 अशी घसरण भारताची झाली आहे. यंदा म्हणजेच 2018 मध्ये भारत या यादीत 103 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर या यादीत पाकिस्तान 106 व्या क्रमांकावर आहे. ज्या देशासोबत भारत स्पर्धा करतो, तो चीन या यादीत 25 व्या स्थानावर आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षांचा अभ्यास केल्यास देशातील भूकबळी संपविण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 
 
ग्लोबल हंगर इंडेक्सकडून जागतिक, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावरील भूकबळीचे आकलन करण्यात येते. भूकबळी कमी करण्याच्या लढाईतील प्रगती आणि समस्यासंदर्भात दरवर्षी एक सर्वेक्षण केले जाते. देशातील किती नागरिकांना गरजेनुसार जेवण मिळत नाही, याचा अहवाल या संस्थेकडून तयार केला जातो. म्हणजे, देशात किती प्रमाणात कुपोषण आहे, याचा अभ्यास या संस्थेकडून केला जातो. त्यामध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या किती चिुकल्यांचे वजन आणि उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे हे पाहण्यात येत.