शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारताने श्रीलंकेवर एक डाव २३९ धावांनी विजय मिळविला

नागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने घेतलेली ४०५ धावांची आघाडी पार करणं श्रीलंकेच्या फलंदाजांना काही केल्या जमलं नाही.श्रीलंकन संघ दुसऱ्या डावात अवघ्या १६६ धावात तंबूत परतला.
 
तिसऱ्या दिवशी पहिला गडी गमावल्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकणं सुरु ठेवलं. श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कर्णधार दिनेश चंडीमलने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाचा पराभव दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने त्याचे प्रयत्न तोकडे पडले.
 
दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. रविचंद्रन आश्विनने सर्वाधीक ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव, इशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत चांगली साथ दिली. दरम्यान आश्विनने नागपूर कसोटीत कसोटी क्रिकेटमधला ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी कसोटी २ डिसेंबरपासून दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु होणार आहे. त्यामुळे या कसोटीत श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.