शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

त्यांची मूल्ये, तत्त्वे आचरणात आणा

तत्त्वज्ञानाचा चालता बोलता विश्वकोष अशी ख्याती असलेले आधुनिक जगातील एक श्रेष्ठ दर्जाचे तत्त्वज्ञ विचारवंत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन. 5 सप्टेंबर 1888 हा त्यांचा जन्मदिवस. तिरूत्ताणी ही त्यांची जन्मभूमी. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या  मातापितच्या धार्मिकतेचा आणि नैतिकतेचा वारसा त्यांना लाभलेला असल्यामुळे भारताची थोरवी, परंपरा सांभाळून, आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने त्यात भर घालून राधाकृष्णन् यांनी भारताची गौरवगाथा उज्ज्वलित केली. ते तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. हाडाचे शिक्षक होते. मुलांविषयी कसे वागावे? याविषयी त्यांनी केलेले लेखन शिक्षकांना, पालकांना मार्गदर्शनी आहे. सदाचरणात परमात्म्याचा अंश आहे आणि असे आपल्याकडून निरंतर राहावे असे आवाहन ते करतात. ‘दि रीजन ऑफ रिलिजन इन काँटेम्पोररी फिलॉसफी’ या त्यांच्या जगविख्यात पुस्तकाचा केंब्रिज ऑक्सफर्ड या  नामवंत विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे.
 
शैक्षणिक क्रांती घडवून आणणार्‍या अनेक शिक्षणतज्ज्ञांची, विचारवंतांची, तत्त्वज्ञानींची ही भारतभूमी! प्रतिकूल परिस्थितीत माळरानावर शिक्षणाचे वृक्षारोपण करून अनेक प्रज्ञावंत विद्यार्थी समाजाला देणारे कर्मवीर! स्त्री आणि दलितांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारे फुले  आणि आंबेडकर! समाजाला आपल्या प्रखर विचाराने जागे करणारे टिळक, आगरकर आणि रानडे! श्रमाधिष्ठित शिक्षण पद्धतीचा अवलंब करणारे म. गांधी आणि साने गुरुजी! गुरुची ओळख स्वत:च्या कर्तृत्वाने सिद्ध करणारे विवेकानंद आणि अब्दुल कलाम!
 
तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलत आहे. आधीचे साधे वर्ग आज ई-लर्निग रूम झालेले आहेत. काळ्या फळ्यावर पांढर्‍या खडूने लिहिलेल्या शिक्षकांच्या वळणदार अक्षरांऐवजी टेबलावरील संगणकावर किंवा भिंतीवरील स्क्रीनवर वेगवेगळ्या फाँटमधील वेगवेगळ्या स्टाइलची रंगीत डिजिटल अक्षरे चमकताना दिसतात. हा काळ संक्रमणाचा आहे. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीत झालेले बदल, वाढणारा कामाचा व्याप शिक्षकांना त्रासदायक वाटत असला तरी हा बदल आपलला स्वीकारावाच लागणार आहे आणि तोही सकारात्मकदृष्टीने! रवींद्रनाथ टागोरांच्या मुक्त आणि ज्ञानरचनावादातून विद्यार्थच कुतूहलाला, जिज्ञासेला खतपाणी पुरवायचे आहे. आपल्या विचारधारा बदलून आपले अस्तित्व अधिक दृढ करावायचे आहे. शिक्षकाची समर्पण भावना इथे खूप महत्त्वाची ठरते. कारण नव-जुन्याचा सुरेख संगम तो आपल्या अधपनात आणणार आहे. विद्यार्थ्यांच्या ग्रहणक्षमतेत वाढ करून त्याच्या स्मरणकक्षेला चालना देणार्‍या शिक्षणपद्धतीचा तो अवलंब करणार आहे. 

समर्थ रामदासांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. बारा वर्षे देशाटन केले आणि छत्तीस वर्षे प्रबोधन केले.
 
‘मुलाच्या चालीने चालावे। मुलाच्या मनोगते बोलावे। तैसे जनास शिकवावे। हळूहळू। आपणाशी जे जे ठावे । ते ते सकळांशी शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।’
 
हा त्यांचा आग्रह होता. आज मुलांच्या चालीला वेग आलेला आहे. आम्ही, शिक्षकांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की आपल्यालाही आपल्या चालीचा वेग वाढवावा लागणार आहे. खास करून नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वस्तुनिष्ठ असल्यामुळे उत्तरपत्रिकांवर गुणांची रेलचेल दिसते. नवीन तंत्रज्ञान वापरून केलेले अध्यापन विद्यार्थ्यांना पटकन समजल्यासारखे वाटते खरे, परंतु पाठातील आशय, कवितेतील भावना, नवीन शोधाची शास्त्रीय बैठक, बदलत उदाहरणांची समीकरणे, विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगावीच लागणार आहेत आणि इथेच आपली स्वत:ची शैक्षणिक साहित्ये, संदर्भ, अवांतरवाचन उपयोगी पडणार! विद्यार्थ्यांच्या सुप्त सृजनशक्तीला चालना मिळणार! अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत मानसिक अवकाशाची गरज आहे. आजही आपल्याला आपल्या शिक्षकांनी शिकविलेल्या कविता मुखोद्गत आहेत. वृत्त मात्रांसह! त्यावेळी तंत्रज्ञान नव्हते पण शिक्षकांमध्ये पूर्ण समर्पणाची भावना होती. विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजून घेऊनच ते शिकवायचे. आज खासगी शिकवण, गाईडस्, वर्कबुक, पॉकेटबुक यांच्या गर्दीत विद्यार्थ्याला आपलेसे करून घेऊन योग्य मार्गदर्शन करणे जिकिरीचे काम झाले आहे. 

तरीही आपल्याला हे माहिती आहे किंबहुना आपल्याला अनुभव आहे. पेरावे तसे उगवते! वाढते! वाढत राहते! साने गुरुजींच्या सहजस्फूर्त   कवितेच्या आधारे आपल्याला असे म्हणता येईल. भारतीय संस्कृतीतील बारा बलुतेदारांच्या कष्टात शिक्षकाचे प्रतिबिंब दिसते. कधी टोपलीभर बी पेरून पोतभर धान्य देणार्‍या शेतकर्‍यासारखा! कधी उभे आडवे धागे काटकोनात जोडून वस्त्र विणणार्‍या विणकरासारखा! तर कधी ओल्या मातीच्या गोळला आकार देणार्‍या कुंभारासारखा! तर कधी मोडकळीस आलेल भिंतीना लिंपून घेऊन त्यांना रंग देऊन भिंतीना नवे स्वरूप देणार्‍या रंगार्‍यासारखा! तर कधी घाव घालून उपयुक्त असे हत्यार तयार करणार्‍या लोहारासारखा! 

अध्ययन-अध्यापन अखंडपणे चालू राहणारी एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत कधी निसर्ग गुरू होतो, कधी ग्रंथ गुरु होतात तर कधी बदलत्या संदर्भात येणारे अनुभव शिक्षकांना बरेच काही शिकवून जातात. पिढी घडविण्याचे हे काम पवित्र आहे. काळ बदलला. विचार करण्याची पद्धती बदलली तरी आपले विद्यार्थी बाहेर जेव्हा आपल्याला भेटतात, ‘सर मी तुमचा विद्यार्थी’ म्हणून नमस्कार करण्यास आपल्यासमोर विनम्र होतो तो क्षण परमोच्च कृतार्थतेचा असतो. शिक्षकाचा तो सर्वात मोठा गौरव असतो.  

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन- भारताच्या राष्ट्रपतीला जन्म देण्याचे महाभाग्य या दिवसाला जसे लाभले तसेच एक आदर्श भारतीय शिक्षक या दिवशी जन्माला आला हे देखील सौभाग्य या दिवसाला लाभले. म्हणूनच पाच सप्टेंबर हा दिवस आम्हा शिक्षकांचा सन्मानाचा दिवस आहे. ज्या ज्या शिक्षणतज्ज्ञांनी आपले योगदान दिले आहे त्या सर्वाना स्मरून त्यांची तत्त्वे, मूल्ये आचरणात आणण्याचा, त्याविषयी चिंतन व आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. 

चंद्रकला शिलवंत