रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (15:46 IST)

Health Tips: किडनी स्टोन तयार होण्याची लक्षणे, उपचार जाणून घ्या

Kidney Stones 1
किडनी स्टोनची समस्या भारतात खूप सामान्य आहे, ही समस्या 25-45 वर्षे वयोगटात सर्वाधिक दिसून आली आहे. संशोधकांना असे आढळून आले की महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा धोका तिप्पट आहे. भारतात दरवर्षी सुमारे 5 ते 7 दशलक्ष (50-70 लाख) लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. किडनी स्टोन म्हणजे किडनीमध्ये खनिजे आणि क्षारांनी बनलेले स्फटिक जमा होणे. या स्थितीमुळे तीव्र वेदना होऊ शकतात, काही लोकांना लघवीची समस्या देखील असते. त्याची लक्षणे वेळीच ओळखून, दगड काढून टाकण्यासाठी उपचार करण्याचा सल्ला दिला जातो.
 
मूत्रपिंड किंवा लघवीच्या मार्गात तयार होणारे कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा किंवा किडनी स्टोन म्हणून ओळखले जातात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर मुतखड्यात होते.
 
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे कमी पाणी पितात, मुतखड्याचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा जास्त मीठ आणि साखरेचे सेवन करतात त्यांना किडनी स्टोन बनण्याचा धोका जास्त असतो. आहाराकडे लक्ष देण्यासोबतच पुरेसे पाणी प्यायल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.
 
किडनी स्टोन बनण्याची कारणे :-
1 लघवीचे प्रमाण कमी होऊन मुतखडा तयार करणारी घटके जास्त प्रमाणात वाढल्याने.
2 लघवीतील न विरघळणारे स्फटिकजन्य पदार्थ एकत्रित जमा झाल्याने.
3 पाण्याचे शरीरात प्रमाण कमी झाल्याने.
4 मूत्रमार्गात होणारे जंतु संसर्गामुळे नायडस तयार होऊन क्षार बनल्याने.
 
मुतखड्याचे प्रकार :-
1 कॅल्शियम: कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होऊन मुतखडा होतो.
2  युरिक अ‍ॅसिड: लघवीत युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढून त्याचे मुतखडे बनतात.
 
लक्षणे :-
मुतखड्याची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाही. मुतखड्याची मूत्रमार्गात हालचाल होऊन अडथळा येतो त्यावेळी तीव्र वेदना जाणवते. 
ज्या बाजूस मुतखडा असेल त्या बाजूस तीव्र वेदना होते.
पाठी, पोट, ओटीपोटात तीव्र वेदना होते. 
लघवीमध्ये रक्त येणे किंवा लघवी करताना वेदना होणे.
लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते. लघवी करताना जळजळ होते. 
ताप किंवा थंडी वाजून येणे.
 
मुतखडा न होण्यासाठी करावयाचे उपाय :-
पाणी जास्त पिणे.
जास्तीत जास्त पाणी पिणे हा निरोगी आयुष्यासाठी आणि मुतखड्यासारख्या विकारावर आळा घालण्यासाठी उत्तम उपाय आहे. मुतखड्यांना रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज पुरेसे पाणी म्हणजेच 8 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 
 
आहारामधील सोडियम आणि प्राण्यांच्या मांसातून मिळणारी प्रथिने (मांस, अंडी) नियंत्रित ठेवल्यास मुतखड्यांचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते. मुतखडा होण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी जवाचे पाणी, उसाचा रस, काकवी यांचे सेवन करावे. 
 
औषधोपचार :-
लिथोट्रिप्सी पद्धत : रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून यंत्राद्वारे खड्याला सूक्ष्म ध्वनी कंपनीने शॉक देऊन त्याचा चुरा करणे. यामध्ये खड्यांचा चुरा लघवीवाटे बाहेर पडतो. त्यामुळे उपचारानंतर रुग्णाला भरपूर पाणी प्यायला सांगितले जाते. या पद्धतीत शस्त्रक्रियेची गरज नाही. शरीरातील कोणत्याही अवयवावर आघात किंवा जखम केली जात नाही.
 
परक्युटॅनिअस नेफ्रोलिथोटॉमी : या उपचारपद्धतीमध्ये दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करून खडा शरीरातून बाहेर काढला जातो. दुर्बिणीद्वारे खडा काढण्याची ही उपचार पद्धती मूत्रपिंडातील व वरच्या मूत्र वाहिन्यातील विविध प्रकारच्या मोठ्या खड्यांसाठी जास्त योग्य आहे.
 
युरेटेरोस्कोपी : मूत्रवाहिनीत असलेले खडे युरेटेरोस्कोपीद्वारे काढता येतात.
 
मुतखडाच्या वेदना दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय:-
1 अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने 15 मिनिटात पोटदुखी थांबते.
2  सराटा (काटेगोखरू)चा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.
3 कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा स्वरस अथवा काढा घेतल्याने वेदना कमी होते. 
4 कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
5 खडा लहान असल्यास आणि जुना नसल्यास मेंदीच्या सालीचे बारीक वाटण करून चूर्ण सकाळी अर्धा चमचा पाण्या बरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी वाटे निघून जातो.
 
किडनी स्टोन होण्यापासून कसे टाळावे?
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्यास किडनी स्टोनची समस्या टाळता येते. शरीराला हायड्रेट ठेवणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे कॅल्शियम घेणे, फळे आणि भाज्यांचे अधिक सेवन केल्याने ही समस्या टाळता येते. किडनी स्टोन टाळण्यासाठी पालक नीट धुवून शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पाण्याच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.



Edited by - Priya Dixit