शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (12:25 IST)

बोधकथा

जनकराजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा. राजा जनक कीर्तन ऐकणत दंग होता. कीर्तन अगदी रंगात आले होते. इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच सांगितले, ‘महाराज! राजवाडय़ाला आग लागली आहे.’ जनक म्हणाला, ‘मी कीर्तन ऐकतो आहे. देवाची भक्ती करतो आहे. आत्ता काही सांगू नको. नंतर ये.’ थोडा वेळ गेला. रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, ‘महाराज!आग भडकली आहे. कोठीघरार्पत थोडय़ा वेळातच पसरेल.’ तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते. तेवढय़ात रक्षकाने तिसरी बातमी आणली, ‘महाराज! आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. सार्‍या प्रजेची घरं जळून खाक होतील.’ हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन् उठला. म्हणाला, ‘किर्तन थांबवा. मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे.’ म्हणजे राजाला स्वत:च राजवाडय़ाचे दु:ख नव्हते. प्रजेचा जीव मालमत्ता त्याला  वाचवायची होती.
 
तात्पर्य - कर्तव्याला लिप्त आणि स्वत:च्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.