शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (13:00 IST)

हिर्‍यापेक्षा जनता महत्त्वाची

एक बादशहा होता. त्याचे संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्न बादशहासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता बादशहाला सतत सतावित होती. त्याने त्याच्या बोटातली हिर्‍याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले. ‘ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मीळ आहे. या हिर्‍याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य आणा व जनतेत वाटप करा.’ मंत्र्यांनी बादशहाला विचारले, राजन, इतका महागडा, दुर्मीळ हिरा तुम्ही का विकता, दुसरी काहीतरी सोय करता येईल. राजा म्हणाला, ‘माझे राज्य हीच संपत्ती आहे. प्रजा उपाशी असताना मी हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.’
 
तात्पर्य :- आपल्या हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल, हे पहाणे इष्ट ठरते.