शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भोपाळ , मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (14:32 IST)

आजही जिथे जातो तिथे हिरोसारखे स्वागत होते

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी आपली लोकप्रियता कायम असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. 'आजही मी जिथे जातो, तिथे लोक एखाद्या हिरोसारखे स्वागत करतात,' असे चौहान यांनी म्हटले आहे.
 
मध्य प्रदेश भाजपच्या मुख्यालयात सोशल मीडियावरील एका कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते. 'भलेही आपण निवडणूक हरलो असू. पण आपल्यावरील लोकांचे प्रेम काय आहे. काँग्रेस आणि भाजपमधला फरक लोकांना कळून चुकला आहे. भरल्या डोळ्यांनी लोक भाजप सत्तेत परतण्याची वाट बघत आहेत,' असे शिवराज म्हणाले.
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा करायचा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. 'येणारी लोकसभा निवडणूक हे एक धर्मयुद्ध आहे. ही लढाई देशभक्त आणि फुटिरतावादी शक्तींमध्ये होणार आहे. ही कुठली छोटी-मोठी निवडणूक नाही, ना कोणत्या व्यक्तीची निवडणूक आहे.
 
ही भारताला वाचवणारी निवडणूक आहे. जनतेच्या मदतीने कोणतीही निवडणूक लढता येऊ शकते,' असे शिवराज म्हणाले.