शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:27 IST)

​​​मुंबई रॅलीत स्वच्छ भारत अभियानासह सायकलिंगचा प्रचार

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून साजरा करताना 'स्वच्छ भारत हरित भारत' असा संदेश देणारी नाशिक ते मुंबई सायकल रॅली उत्साहात संपन्न झाली.
 
नाशिक, महाराष्ट्रासह भारतात सायकल चळवळीला बळ मिळावे यासाठी नाशिक सायकलिस्टस प्रयत्न करीत आहे. याच धर्तीवर स्वच्छता आणि पर्यावरण यांच्याबद्दल विशेष आस्था असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर रोजी भारतीय सायकल दिन साजरा व्हावा यासाठीची नाशिक मुंबई सायकल रॅली सलग दुसऱ्या वर्षी करण्यात आली. ही रॅली यशस्वी होण्यासाठी डॉ. मनीषा रौंदळ, रवींद्र दुसाने यांनी प्रयत्न केले.
 
२ ऑक्टोबर रोजी भारतीय सायकल दिन साजरा व्हावा यासाठी नाशिक सायकलिस्टस स्थापनेपासूनच प्रयत्न करीत आहेत. २०१२ पासून नाशिक शहरात विविध रॅली आयोजित केल्या जात होत्या. मात्र ही चळवळ राज्य तसेच देश पातळीवर जावी यासाठी २०१६ सालापासून १ आणि २ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय नाशिक मुंबई सायकल करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी भिवंडी फाट्यापर्यंत प्रवास केल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता शांग्रीला रिसॉर्ट पासून सायकलिस्टसने मुंबईकडे कूच केली. मध्यात ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्व सायकलिस्टस सदस्यांचे जंगी स्वागत केले. येथूनच उठणे आणि मुंबईतील १५ सायकलिस्टस रॅलीमध्ये सहभागी झाले. या सर्वांनी वाहतुकीचे नियोजनात मदत करत सायकलीस्ट्सना वेळेत पोहचण्यास मदत केली.
दुपारी १२ पर्यंत सर्व सायकलिस्टस गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचले. तेथे एमटीडीसीचे सहव्यवस्थापक आशुतोष राठोड यांनी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांच्यासह सर्व सायकलिस्टसचे स्वागत केले. यावेळी कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त सिन्हा, आयपीएस अधिकारी तसेच आयर्नमॅन किताबाचे मानकरी असलेले कृष्णप्रकाश सर यांनी या चळवळीचे कौतुक केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वछ भारत अभियानाला ३ वर्षे पूर्ण होत असताना मुंबई शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरु होत्या. या स्वयंसेवकांना सायकलिस्टसकडे  बघून अप्रूप वाटत होते. नाशिक सायकलिस्टसकडे असलेल्या स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे फलक मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होत्या. गेटवे ऑफ इंडियाच्या पर्यटकांना यावेळी सायकलचे महत्व पटवून देत सायकलचा प्रचार व प्रसार करण्यात आला. नाशिकमध्ये सुरु असलेल्या सायकल चळवळीचे कौतुक यावेळी सर्वांनीच केले.
 
पर्यटकांमध्ये रुजवणार सायकल संस्कृती​
पर्यटकांमध्ये सायकल संस्कृती रुजवण्यासाठी नाशिकमध्ये रेल्वे स्टेशन व बस स्टॅण्डवर सायकल स्टॅण्ड उभारण्याची घोषणा करणाऱ्या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या निर्णयाचे स्वागत यावेळी करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त त्यांनी याबाबत निर्णय घेत राज्यातील सहा ते सात ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार असून त्यात पहिला प्रयोग नाशिकला करण्यात येणार आहे. पर्यटकांना शहरात व इतरत्र सर्व स्थळे सायकलिंग करून बघता यावी यासाठी ही संकल्पना पुढे आल्यानंतर त्यात नाशिकची निवड करण्यात आली आहे. यासाठी नाशिक सायकलिस्टस पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी यावेळी दिली.