शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:44 IST)

मुंबई विद्यापीठाने फी दरवाढ मागे घ्यावी

मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा व फेरपरीक्षा शुल्क या सत्रापासून सुमारे दुपटीने वाढवले आहे. याबाबत प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांची आज मुंबई प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी भेट घेऊन फी दरवाढ मागे घेण्याचा इशारा दिला. मुंबई विद्यापीठाचे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा शुल्क ६५०/- रुपयांवरून १५६०/- रुपये केले आहे. पुनर्मूल्यांकनाचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार याबाबत शाश्वती नसल्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना फेरपरीक्षांचे अर्ज भरणे अनिवार्य झालेले आहे. एकीकडे पुनर्मूल्यांकनाचे २५० रुपये आणि छायांकित प्रतीचे शुल्क ५० रुपये या नव्या शुल्क नियमानुसार ३०० रुपये बचत झाली असली तरी फेरपरीक्षाच्या शुल्कामध्ये एकदम ९०० रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे विद्यार्थांना जवळपास ६०० रुपयांचा फटका सोसावा लागणार आहे याचा अर्थ विद्यापीठाने विद्यार्थांची फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया अमोल मातेले यांनी दिली.