बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (15:32 IST)

चंद्राबाबू नायडू शिवसेने सोबत बोलले की नाही लवकरच कळेल

शिवसेनेने भाजपा वर आपली नाराजी वेळो वेळी दाखवली आहे. किंबहुना प्रत्येक निर्णयात शिवसनेने प्रचंड विरोध दाखवला आहे. काश्मीर मुद्दा असो वा शेतकरी कर्जमाफी, शिवसेना सत्तेत असून भाजपा देत असललेल्या वागणुकीवर जोरदार टीका करत आहे. त्यात आता एन डी ए चे सहकारी चंद्राबाबू नायडू यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे भाजपची राज्य पातळीवर चागलीच गोची होताना दिसतेय. त्यात शिवसेने सोबत नायडू बोलले अशी बातमी आली त्यावर सुद्धा शिवसेनेन जोरदार टीका केली आहे. चुकीच्या बातम्या पसरवू नका, आधी काम करा मात्रोश्रीवर कोण कोण येते ते आम्ही सांगू असा दमच भाजपाला सामना मधून भरला आहे,

काय म्हणतेय शिवसेना वाचा : 

सध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे. आम्हीच ही ‘उबग’ स्पष्टपणे समोर आणली, पण आता चंद्राबाबूंनीही ती खदखद बाहेर काढली. चंद्राबाबूंना आमच्या शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या राजकीय मसलती त्यांनीच कराव्यात. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी मध्यंतरी येऊन गेल्या. त्यांनाही सदिच्छा म्हणून भेटलो. आम्ही त्यांना भेटलो यावरही अनेकांनी तर्ककुतर्कांची फवारणी केली. आता चंद्राबाबूंच्या बाबतीत तेच सुरू आहे. एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवलाय हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल अशी आशा आम्ही बाळगत आहोत.

श्री. चंद्राबाबू नायडू व आमच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असे बोलले जात आहे. असे बोलल्याचे आम्ही राष्ट्राच्या चौथ्या स्तंभात वाचले आहे. भिंतीलाही कान असतात हे आम्ही ऐकून होतो, पण आता दूरध्वनीलाही कान लागलेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. श्री. नायडू हे आमच्याशी खरेच बोलले काय व नेमके काय बोलले यावर आता तर्कवितर्क लढवून चौथा स्तंभ ‘सब से तेज’ पत्रकारितेचे दर्शन घडवीत आहे. शिवसेनेने २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक स्वाभिमानी भूमिका नक्कीच घेतली आहे, पण असा मर्दानी स्वाभिमान दाखवायची हिंमत यापुढे कोण दाखवणार आहेत? केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशच्या तोंडास पाने पुसली व ज्या घोषणा आंध्रच्या बाबतीत केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या नावाने खडे फोडत चंद्राबाबूंनी भाजपविषयी नाराजी व्यक्त केली. चंद्राबाबू यांनी त्याआधी असेही सांगितले आहे की, भाजप नेते तेलुगू देसमवर बेताल तोंडसुख घेत आहेत. आपल्या नेत्यांना रोखणे ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे, पण असे होताना दिसत नाही. अर्थात चंद्राबाबू यापेक्षा बरेच काही बोलले आहेत व भाजपच्या वागणुकीने त्यांचा तिळपापड झाला असला तरी त्यांच्या युतीचा पापड टीचभर तरी तुटेल काय? शिवसेना व तेलुगू देसम पक्षात जमीन अस्मानचे अंतर आहे.