गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (08:20 IST)

सरकारच्या विरोधात थेट 'हल्लाबोल' आंदोलन छेडणार- सुनील तटकरे

आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाची विविध मुद्यांवरची भूमिका स्पष्ट केली. दि. ६ व ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन बैठकीत झालेल्या चर्चेचा परिपाक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता या सरकारविरोधात अधिक तीव्र व निर्णायक आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. 

 

तटकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून ते म्हणतात की  पूर्णतः फसलेली कर्जमाफी, वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा पुरविण्यात सरकारला आलेले अपयश, वाढती बेरोजगारी या व अशा मुद्द्यांवर आंदोलनाची धार प्रखर करण्याची रणनीती आम्ही आखली आहे.तसेच कर्जमाफी, शहरीकरणाच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सांगली येथे अनिकेत कोथळेचा खून हा यंत्रणेने केलेला खून आहे. हे मुद्देही आम्ही सर्व शक्तीनिशी लावून धरणार आहोत.त्याचप्रमाणे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संबंधीही आमची चर्चा झाली व आम्ही आता कंबर कसून कामाला लागलो आहोत.

यामध्ये पुढे म्हणतात की २५ नोव्हेंबरपर्यंत ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा या सरकारने केली होती. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यापासून जाणूनबुजून दिरंगाई केली गेली. अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. म्हणूनच २५ नोव्हेंबर पासून सरकारवर थेट हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.सर्वच स्तरावर अपयशी ठरलेल्या सरकारच्याविरोधात २५ नोव्हेंबर रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनी कराड येथून आम्ही हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करणार आहोत. आंदोलन आणि दिंडीच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग मिळतो. १ डिसेंबर रोजी यवतमाळ येथून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत. या पदयात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते पायी चालत जाणार आहेत. पदयात्रे दरम्यान कोणतेही वाहन वापरले जाणार नाही. पवना, वर्धा मार्गे १० डिसेंबरपर्यंत नागपूरपर्यंत जाईल व ११ डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या ठिकाणी ही पदयात्रा समाप्त करताना आम्ही विधानसभेवर धडकणार आहोत.

या पत्रकार परिषदेला विधिमंडळ पक्षनेते मा. अजित पवार तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते मा. नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील उपस्थित होते.