गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (11:08 IST)

बाळासाहेबांना अटक करताना कुठे गेली होती आपुलकी?

उध्दव ठाकरे यांचा रोखठोक सवाल
जात-पात न मानणारा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा एकही नेता या देशामध्ये झाला नाही, असे पुण्यातील मुलाखतीत सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. 2000 साली वयाच्या 70 व्या वर्षी बाळासाहेबांना अटक करताना त्यांच्याबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
 
पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला होता. हाच धागा पकडून उद्धव यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. 2000 साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुणीही ठोसभूमिका घेतली नाही. त्यांची अटक रोखण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत, असे उद्धव म्हणाले. मुंबई तोडू देणार नाही असे काही जण सांगतात, पण गरज असल्यावर आम्ही ठाम आहोत. तुमच्याही काळात मुंबई तोडण्याचा प्रयत्न होत होता. त्यावेळीही शिवसेना ठामपणे उभी होती, असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले.
 
उद्धव काय म्हणाले?
* जातीपातीच्या आधारावर आरक्षण हे कशासाठी बोलताय. 
 
* मी चोरूनसुद्धा मुलाखत पाहिली नाही.
 
* 50 वर्षांपूर्वी बाळासाहेब बोलले होते, ते आज पवार बोलतात. 
 
* बँकांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुणी बँक बुडवली तर त्यांना ठेवी परत देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे.