शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (12:11 IST)

श्री गजानन महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग : जेव्हा महाराज काळाराम मंदिराच्या जवळ येऊन थांबले

जन्मतः अष्टसिध्दी प्राप्त असलेल्या महाराजांनी जीवदशेला आल्यावर सर्व मर्यादांचे पालन केले. अक्कलकोटाला श्री स्वामी समर्थांजवळ राहिल्यानंतर महाराज नासिक पंचवटी येथे साधना करू लागले. ही साधना चालली असताना महाराजांच्या अलौकिक रामभक्तिचा प्रत्यय देणारी महान घटना पंचवटीत घडली. 
 
साधना सुरू करण्यापूर्वी पंचवटीत रामदर्शन करावं म्हणून काळाराम मंदिराच्या जवळ येऊन थांबले. दुपारी बाराचा सुमार , रणरणत ऊन, मंदिराची दार बंद  करून पुजारी लगबगीनं जाण्याच्या बेतात असलेला, अशावेळी २० —२२ वर्षाचे  महाराज दारात येऊन उभे राहिले. महाराज मंदिराच्या दारात उभे आहेत याकडे त्या 
 
पुजार्‍याने लक्षही दिले नाही. नेहमीच्या सरावाने दार बंद करण्यासाठी ओढणार, एवढ्यात महाराजांनी एक पाय बंद असलेल्या दरवाज्यात  ठेवला, आणि काय आश्चर्य  महाराजांचा पाय मंदिरात पडताच मंदिरातील भव्य घंटा खणखणून वाजू लागल्या. घट्टांचा असा घणघणाट सुरू झाला की पुजारी अवाक होऊन बघत राहिले. 
 
महाराजांच्या आतापर्यंतच तेजोवलय त्यांच्या व्यक्तिमत्त्व भोवती गरगरू लागले. पुजारी एका कोपर्‍यात उभे राहून ते दृश्य भारावल्यासारखे बघत होते. त्यांना जागच हालता येईना.
 
महाराज महाव्दार ओलांडून आत आले आणि रामरायाच्या चरणावर लांबूनच नतमस्तक झाले. तो आश्चर्य असे की महाराजांनी रामरायाला प्रणिपात करताच रामरायांच्या चरणावरची फुले भरभर उडून महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. 
 
स्वागत केले निजभक्ताचे करुनी घंटानाद ।
भक्त लाडका भेटी आला।
हर्षुनी फुले चरणावरची देती आशीर्वाद ।
 
रामरायाला दंडवत घालून महाराजांनी मस्तक वर उचललं तो गाभार्‍यातून प्रकाशाचा एक प्रखर आणि तेजस्वी असा झोत महाराजांच्या डोळ्याला येऊन भिडला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनून गेला. 
 
हा चमत्कार पाहून पुजारी धावून महाराजांच्या पायाला कडकडून मिठी मारली. रामरायांचा महाराजांना अनुग्रह मिळाला आणि महाराजांच्या कृपादृष्टीने पुजारी पावन झाला. हा रामभक्तीचा प्रवाह त्यांच्या अनेक लीलांमधून पुन्हा पुन्हा खळखळत राहिला. 
 
शेगावात आजही रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात.....
 
काय वानू आता न पुरे हे वाणी।
मस्तक चरणी ठेवीतले।
तुका म्हणे सुख पविया सुखे.
अमृतहे मुखे स्त्रवतसे
 
श्री गजानन महाराज की जय।