शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

बसला तो संपला

रामदास स्वामींनी म्हटले आहे, कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. आपण हा कायदा पाळत तर आहोतच पण जरा जास्तच प्रमाणिकपणाने पाळत आहोत आणि थांबायला तयार नाही. पण आपण आता कामाच्या निमित्ताने एवढे एका जागी बसत आहोत की बसल्या जागी कामे करणारांना थोडे उठा, चालायला लागा, फार बसला तो संपला, असे सांगावे लागणार आहे.
 
बैठे काम हे आपल्यासाठी आवश्यचकच झाले आहे. कारण कष्टाची कामे कमी झाली आहेत. पण बैठी कामे करणारे लोक किती काळ एका जागेवर बसतात आणि बसून नेमके काय काम करतात यावर त्यांच्या आयुष्याची जोखीम अवलंबून आहे. अधिक काळ कामासाठी एका जागेवर बसणारे लोक लवकर मरण पावण्याची शक्यता आहे.
 
जे लोक एकाच जागेवर सलग एक किंवा दोन तास बसतात त्यांच्या बाबतीत मृत्यूचा धोका अधिक आहे. मात्र, एक किंवा दोन तास बैठे काम करताना अधूनमधून उठत असेल आणि दर अर्ध्या तासाला बसल्या जागेवरून उठून चालत असेल, काही हालचाल करीत असेल तर ही लवकर मरण पावण्याची जोखीम तुलनेने कमी आहे.
 
तेव्हा आपण किती तास बसता याला महत्त्व आहेच पण त्यापेक्षा सलग किती वेळ बसता आणि उठबस करण्याचे वेळापत्रक कसे आहे याला महत्त्व आहे. सांगायचे झाले तर बैठे काम करणे अपरिहार्यच असेल तर ते करणे भागच आहे पण ते करताना दर अर्ध्या तासाला उठावे आणि चार पावले चालावीत.