मुंबई इंडियंसचा सरळ विजय
WD
गिलख्रिस्ट भज्जीच्या पहिल्याच षटकात पायचीत झाला. त्यामुळे धास्तावलेल्या पंजाबने सावध खेळणेच योग्य मानले. पॉल व मार्श यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी करीत संघाला सावरले. परंतु, सायमंड्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याचा मोह पॉलला (३३) आवरला नाही आणि तो पोलार्डकरवी झेलबाद झाला. हसी (२), कार्तिक (१) हे स्वस्तात परतले. मार्श (४७ चेंडूंत ६१) आणि अभिषेक नायर (१४) यांनी विजयासाठी संघर्ष केला. त्यानंतर तळाचे फलंदाज मात्र हजेरी लावूनच परतले.
तत्पूर्वी, १० चेंडूंत १० धावा करून डेव्हिड जेकब तंबूत परतल्यानंतर अंबाती रायडू (५१) आणि कर्णधार सचिन तेंडुलकर (५१) या जोडीने मैदानात विकेट तर टिकवून ठेवलीच, शिवाय लक्षवेधी फटकेबाजीही केली. त्यांच्या अर्धशतकांच्या बळावरच मुंबई इंडियन्सने मोठी धावसंख्या उभारली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी रचली. अंबाती रायडूने अवघ्या ३५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. ५१ धावांवर असताना चावलाच्या चेंडूला सीमापार करण्याच्या प्रयत्नात मारलेला फटका दिनेश कार्तिेकने टिपला आणि रायडूचा खेळ संपला. तो बाद होताच सचिनने फटकेबाजी सुरू केली. ४३ चेंडत त्याने अर्धशतक पूर्ण केले. हॅरिसच्या चेंडूवर सचिनचा फटका थेट नायरच्या हातात विसावला. त्यानंतर आलेल्या पोलार्डने केवळ ११ चेंडूंत २० धावा चोपल्या. यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने झटपट धावा करण्याचा सपाटा लावला. ११ चेंडूंत १८ धावा करीत त्याने संघाला १५९ धावसंख्येपर्यंत खेचले.
